राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आता बिहारमध्ये नव्या राजकीय खेळीला सुरूवात केल्याचे दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीअगोदर सातत्याने पक्षविरोधी विधानं केल्याप्रकरणी जनता दल यूनायटेड (जेडीयू) मधुन प्रशांत किशोर उर्फ ‘पीके’ यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर प्रथमच माध्यमांसमोर व्यक्त झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी प्रश्न उपस्थित करणार नाही. माझे त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत. मात्र, आम्हाला सशक्त नेतृत्व हवं आहे, असं त्यांनी आवर्जुन सांगितलं आहे. तसेच, याप्रसंगी प्रशांत किशोर यांनी एक महत्वपूर्ण घोषणा देखील केली, २० फेब्रुवारीपासून ‘बात बिहार की’ हा नवा कार्यक्रम  सुरू करत असल्याचेही ते म्हणाले.

‘बात बिहार की’ बद्दल माहिती देताना प्रशांत किशोर म्हणाले, या कार्यक्रमा अंतर्गत बिहारमधील ८ हजार ८०० पंचायतींमधुन अशा एक हजार युवकांची निवड केली जाणार आहे, ज्यांची अशी इच्छा आहे की, पुढील दहा वर्षांमध्ये बिहारचा समावेश देशातील दहा प्रमुख राज्यांमध्ये असावा. मात्र, त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केलं की, ते कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर जाण्याच्या विचारात नाही.

भाजपा व जेडीयूच्या युतीवर टीका करताना ते म्हणाले, विकासासाठी युती झालीच पाहीजे असं आवश्यक नाही. भाजपाबरोरची युती विकास करत नसल्याचेही ते म्हणाले. २००५ मध्ये बिहारची जी परिस्थिती होती, अन्य राज्यांच्या तुलनेत बिहारमध्ये तशीच परिस्थिती कायम असल्याचंही पत्रकारपरिषदेत प्रशांत किशोर यांनी सांगितलं.