विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना परीक्षांसाठीची नियमावली जाहीर केली आहे. करोना संसर्गामुळे या वर्षीचं सत्र सुरू करण्यास उशीर झाला आहे आणि परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता आयोगाने सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना परिक्षांबद्दलचे निर्देश दिले आहेत.

आयोगाने सांगितलं की, २०२१-२२ च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि उरलेल्या रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. त्याशिवाय सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना १ ऑक्टोबर रोजी नवं शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशा सूचना आयोगाने केल्या आहेत.

हेही वाचा – अकरावीच्या सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी सुरू; कशी असेल प्रवेशप्रक्रिया, जाणून घ्या!

तसंच परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिक्स पद्धतीने ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे यूजीसीने सांगितलं की १२वीच्या सर्व बोर्डांच्या परिक्षांचा निकाल ३१ जुलैपर्यंत लागेल. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. सत्र परीक्षा घेण्याचा किंवा सत्र संपल्यानंतर सुट्ट्या देण्याचा निर्णय त्या त्या शिक्षणसंस्थांचा राहील.