पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कोसी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुजरातने दिलेला पाच कोटी रुपयांचा निधी नितीशकुमार यांनी उद्धटपणे परत केला. त्यामुळे अशा उद्धट राजकीय नेत्यापासून जनतेने दूर जावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.
गुजरातमधील जनतेने कोसी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविलेला पाच कोटी रुपयांचा निधी नितीशकुमार यांनी परत केला त्यावरून ते सत्तेने झिंगलेले आणि त्यांच्या डोक्यात हवा गेल्याचे सिद्ध होते, अशी टीका मोदी यांनी केली. उद्धटपणामुळेच ते कोसी पूरग्रस्तांच्या वेदना विसरले आणि त्यांनी मदत परत केली, असेही पंतप्रधान म्हणाले.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या काँग्रेसशी हातमिळवणी केल्याबद्दल मोदी यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. ही जयप्रकाश नारायण यांच्याशी केलेली प्रतारणा आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला. नितीशकुमार यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आत्म्याला वेदना दिल्या आहेत की नाही, असा सवाल मोदी यांनी केला. राजदशी हातमिळवणी करण्यावरूनही त्यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. बिहारमध्ये जंगल राज दरवाजा ठोठावत आहे, असे ते म्हणाले.कोसी विभागात सहरसा, मधेपुरा आणि सुपौल जिल्हे येत असून त्यामध्ये बिहार विधानसभेचे १३ मतदारसंघ आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सभेला राजकीयदृष्टय़ा महत्त्व आहे.