महाराष्ट्रानंतर आता झारखंड देखील भाजपाच्या हातून गेलं आहे. झारखंड छोटं राज्य आहे, त्या ठिकाणी पाच वर्ष भाजपाची सत्ता होती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हे राज्य जिंकण्यासाठी  ताकद लावली होती. नव्या नागरिकत्व कायद्याचा झारखंडला फायदा होईल, अशाप्रकारची भाषणं केली गेली होती. मात्र तरी देखील झारखंडच्या गरीब व आदिवासी जनतेने भाजपाला नाकारलं, अशी प्रतिक्रिया झारखंडमधील मतमोजणीचे कल पाहून शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

आणखी वाचा – भाजपाने गोव्यासारखा प्रयोग केला, तर तुम्ही तयार आहात का? राजीव सातव म्हणाले…

यावेळी राऊत म्हणाले की, काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार येईल, अशाप्रकारचे जे आकडे समोर आलेले आहेत. हे पाहता मला असं वाटतं की, महाराष्ट्रानंतर झारखंड का गेलं? याचं भाजपाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. नव्या कायद्यानंतर ज्याप्रकारे देशात वातावरण तयार करण्यात आलं होतं, त्याचा झारखंडमध्ये काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आणखी एक राज्य भाजपाने गमावलं आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे.