Multi-Storey Building Collapses Like pack of cards in Shimla : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी (३० जून) सकाळी शिमल्यातील भट्टाकूफर माठू कॉलोनीतील एक पाच मजली इमारत (भवन) पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारण आधीच धोक्याची सूचना मिळाल्यामुळे रविवारी (२९ जून) ही इमारत रिकामी करण्यात आली होती.

इमारतीजवळच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम चालू आहे. या कामामुळे इमारतीच्या आसपासच्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. या कामामुळेच इमारत कोसळल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. ही पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीमधील लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. ही इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूची घरं व लहान इमारती हादरल्या. तसेच मुसळधार पाऊस देखील चालू आहे. त्यामुळे भट्टाकूफर माठू कॉलोनीतील रहिवासी घाबरले आहेत. काहींनी घरं रिकामी करून इतरत्र आश्रय घेतला आहे.

स्थानिक रहिवाशांचे रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीवर गंभीर आरोप

चमियाना ग्रामपंचायतीचे उपसरपंच यशपाल शर्मा याबाबत म्हणाले, “भट्टाकूफर येथे कोसळलेल्या इमारतीजवळ अनेक घरं आहेत. या घरांवर धोक्याची टांगती तलवार आहे. बाजूला राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. हे काम करणाऱ्या कंपनीला अनेकदा धोक्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी यावर कोणताही ठोस उपाय शोधला नाही. त्यांनी केवळ स्थानिकांना सुरक्षा देण्याचे दावे केले. अखेर आज मोठी दुर्घटना घडली.

स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर आणि चारपदरी रस्त्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. रहिवाशांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम करत असताना कंपनीने आजूबाजूच्या घरांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. या कामामुळे रहिवाशांचा जीव आणि त्यांची मालमत्ता धोक्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

स्थानिक रहिवाशांनी रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्या घरांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावी अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासह बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.