पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सकाळी कू अॅपवर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. “पंजाबच्या इतिहासात कुणी घेतला नसेल, असा निर्णय आज मी जाहीर करेन”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. दुपारी ३ च्या सुमारास भगवंत मान यांनी त्यासंदर्भात मोठी घोषणा केली. याच घोषणेच्या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये पंजाबच्या जनतेला अजब आवाहन केलं आहे. पंजाब सरकारने केलेल्या या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भगवंत मान यांनी जाहीर केल्यानुसार दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी पंजाबमध्ये अँटि करप्शन हेल्पलाईनची घोषणा केली. २३ मार्चपासून पंजाबमध्ये अँटि करप्शन हेल्पलाईन सुरू होणार असून राज्यातल्या लोकांना त्या क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंजाबमधून भ्रष्टाचार हद्दपार करण्याची घोषणा आपनं निवडणुकांच्या आधी केली होती. त्यानुसार या हेल्पलाईनची घोषणा करण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल यांचं आवाहन!

दरम्यान, भगवंत मान यांनी केलेल्या घोषणेवर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांना भ्रष्टाचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. “जर कधी तुमच्याकडे कुणी लाच मागितली, तर त्याला नकार देऊ नका. त्याऐवजी तुमचं संभाषण रेकॉर्ड करा आणि ती ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवा. आम्ही तुम्हाला खात्री देतो, की अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल”, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.

“जेव्हा मी दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा देखील मी अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला होता. त्या ४९ दिवसांमध्ये आम्ही जवळपास ३० ते ३२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवलं होतं”, असं केजरीवाल म्हणाले.

Video : “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिल्लीतून भ्रष्टाचार हद्दपार झाला आणि तो फोन नंबर सामान्यांच्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र ठरला”, असं देखील केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.