गायींच्या तस्करी प्रकरणी पेहलू खान याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांच्या या कृतीवर पेहलू खान यांचा मुलगा इरशादने शनिवारी जोरदार टीका केली. हे षडयंत्र असल्याचा आरोप इरशादने केला आहे. परवानगीशिवाय गायींची वाहतूक केली म्हणून १ एप्रिल २०१७ रोजी काही तथाकथित गोरक्षकांनी पेहलू खानला मारहाण केली होती. त्यानंतर तीन दिवसांनी पेहलू खानचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात पेहलू खानचा मुलगा इरशाद आणि अरीफ या दोघांच्या नावाचा सुद्धा समावेश केला आहे. आरोपी मोकाट फिरत असताना पोलीस आम्हाला जबाबदार धरत आहेत. पोलीस तपासातील अनेक त्रुटींवर इरशादने बोट ठेवले आहे. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे इरशादने सांगिले. या प्रकरणात तपास व्यवस्थित झालेला नसून पोलीस सुद्धा षडयंत्राचा भाग आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना मारले आणि आता आम्हालाच सगळयासाठी जबाबदार धरत आहेत. हा अन्याय आहे असे इरशाद खानने सांगितले.

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे तरी तू यामागे षडयंत्र आहे असं का म्हणतोस? असा सवाल केला. त्यावर मला काँग्रेस किंवा अन्य कोणाबद्दल काही माहित नाही. सर्व काही पोलिसांच्या हातात आहे एवढेच मला म्हणायचे आहे असे इरशाद खानने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. भाजपा किंवा काँग्रेसने काय केले त्याची मी फिकीर करत नाही. पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनेक लोकांसमोर माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आणि तरीही कोणीही माझ्या वडिलांची हत्या केली नाही असा त्यांचा दावा आहे. हा सरळसरळ अन्याय आहे असे इरशाद म्हणाला.