केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकार महिला सुरक्षा आणि महिलांना न्याय देण्याबद्दल बोलत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती चिंताजनक असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर येतात. राजस्थानच्या अजमेर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अजमेरच्या एका खासगी शाळेतील विद्यार्थीनीवर मागच्या वर्षी सामूहिक बलात्कार झाला होता, त्यामुळे या मुलीला आता बारावीच्या परिक्षेस बसू देण्यात आलेले नाही, असा आरोप पीडितेच्या वतीने करण्यात आला आहे. पीडितेने शाळेविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, शाळेतील वातावरण खराब होईल, अशी सबब पुढे करून तिला बारावीच्या परीक्षेस बसू दिले नाही. पीडितेच्या आरोपानंतर खळबळ उडाली. बाल कल्याण आयोगानेही या प्रकरणात आता लक्ष घातले आहे. मात्र शाळेने वेगळीच भूमिका घेतली. सदर पीडित विद्यार्थीनी मागच्या चार महिन्यांपासून शाळेत आलेली नसल्यामुळे तिला परीक्षेस बसू देण्याची परवानगी दिली नाही, असे शाळेच्या वतीने सांगितले गेले. पीडित मुलीने दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षेस बसण्याचा प्रयत्न केल्यानंतर या शाळेने तिला बाल कल्याण आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. बाल कल्याण विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली असून खटला दाखल केला आहे. तसेच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत चार वर्षांच्या मुलीवर ३४ वर्षीय तरुणाकडून बलात्कार, पांडव नगरमध्ये तोडफोड आणि तणाव बाल कल्याण आयोगाच्या अध्यक्षा अंजली शर्मा म्हणाल्या की, आम्ही पीडित विद्यार्थीनीशी संवाद साधला असून हे संपूर्ण प्रकरण समजून घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करत असतानाच एका बाजूला पीडित विद्यार्थीनीची मार्चमध्ये हुकलेली परीक्षा पुन्हा कशी देता येईल, याकडे प्राधान्याने लक्ष दिले असल्याचे अंजली शर्मा यांनी सांगितले. प्रकरण काय आहे? ऑक्टोबर २०२३ मध्ये पीडित विद्यार्थीनीवर तिचे काका आणि इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने मुलीला शाळेत न येण्याचा सल्ला दिला. तिने घरूनच अभ्यास करावा, जेणेकरून शाळेचे वातावरण खराब होणार नाही, असे शाळेने सुचविले होते, अशी माहिती पीडित मुलीने अंजली शर्मा यांना दिली. नागपूर : पुजाऱ्यासह चौघांनी केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार त्यानंतर जेव्हा बारावीची परीक्षा जाहीर झाली, तेव्हा पीडित विद्यार्थीनी आपले हॉलतिकीट आणण्यासाठी शाळेत गेली. पण ती आता शाळेची विद्यार्थीनी नाही, असे तिला सांगण्यात आले. इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी या मुलीच्या शाळेतील उपस्थितीवर आक्षेप घेतल्यानंतर शाळेने तिला घेण्यास मनाई केल्याचे तिच्या लक्षात आले. अंजली शर्मा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, पीडित विद्यार्थीनी अभ्यासात अतिशय हुशार आहे. दहावीच्या परीक्षेत तिने ९७ टक्के गूण मिळविले होते. जर तिला बारावीच्या परिक्षेला बसू दिले तर ती नक्कीच चांगले गूण मिळवेल. पण शाळेच्या निष्काळजीपणामुळे तिचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.