चार तामिळींसह बोटीने ऑस्ट्रेलियात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या ४१ श्रीलंकन नागरिकांना गेल्या महिन्यात परक पाठवण्यात आले. ते बहुधा स्मगलिंग (तस्करी) करीत होते व त्यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. कोकॉस बेटांवर गेल्या महिन्यात बॉर्डर प्रोटेक्शन कमांडने या बेकायदा जहाजाला प्रवेश नाकारला. ऑस्ट्रेलियाने त्यांना ताब्यात घेतले व नंतर त्यांच्या देशाच्या ताब्यात दिले.
ऑस्ट्रेलियाचे स्थलांतर मंत्री स्कॉट मारिसन यांनी एक महिन्यानंतर केलेल्या निवेदनात ही घटना घडल्याची कबुली दिली. एकूण दोन जहाजे होती. त्यातील एकात ४१ श्रीलंकन नागरिक होते, पण दुसऱ्या जहाजात दीडशे लोक होते त्यांच्याविषयी काही माहिती मॉरिसन यांनी दिली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय निकषानुसार श्रीलंकेच्या नागरिकांची तपासणी करण्यात आली व नंतर त्यांना परत पाठवण्यात आले. या जहाजातील एका सिंहली नागरिकाने आम्हाला आमच्या देशात परत जाऊ द्या अशी मागणी केली. या जहाजात ३७ सिंहली व चार तामिळी नागरिक होते.
यापूर्वीही श्रीलंकेच्या नागरिकांना परत पाठवण्याच्या घटना घडल्या आहेत असे सांगून मॉरिसन म्हणाले, की ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय निकषानुसार चालेल. स्मगलर्स किंवा बेकायदा कारवाया करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नाही असे ते म्हणाले. कुणाच्या दबावामुळे आम्ही आमचे धोरण बदलणार नाही.
 स्मगलर्समुळे १२०० लोकांचा समुद्रात मृत्यू झाला आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या देशात पूर्वीपासून स्मगलिंग रोखण्यासाठी सहकार्याची भूमिका राहिली आहे. तिचे या वेळीही पालक करण्यात आले आहे.