तामिळनाडूतून सुरूवात झालेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा १३ वा दिवस आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येण्यासाठी काँग्रेसने भारत जोडो यात्रेचं आयोजन केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करणार आहे. मात्र, या यात्रेची सुरुवात कोठून करायला हवी होती, याबाबत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे.

प्रशांत किशोर विदर्भ दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी प्रशांत किशोर यांना भारत जोडो यात्रेसंदर्भात विचारलं. त्यावर प्रशांत किशोर म्हणाले, “काँग्रेसने गुजरातमधून भारत जोडो यात्रेची सुरुवात करायला हवी होती. कारण तिथे विधानसभा निवडणूका होणार आहे. अन्यथा उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशसारख्या भाजपा शासित राज्यातून भारत जोडो यात्रा सुरु झाली पाहिजे होती.”

हेही वाचा – “भाजपाची दुसरी शाखा राज ठाकरेंचा…”, अंबादास दानवेंचा टोला; म्हणाले, “भाषा, वर्तन मिळते जुळते”

“विदर्भ वेगळा झाला तरी…”

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर प्रशांत किशोर यांनी म्हटलं, “छोट्या राज्यांच्या दृष्टीकोनातून विदर्भाला पाहिलं जाऊ नये. विदर्भाच्या मागणीचा मुद्दा तेथील भौगोलिक आणि सामजिक परिस्थितीशी निगडीत आहे. विदर्भ वेगळा झाला तरी लहान राज्य नसेल. विदर्भात १० लोकसभा मतदारसंघ येतात. भारतात १० लोकसभा मतदारसंघापेक्षा कमी मतदारसंघ असलेली राज्य आहेत,” असेही प्रशांत किशोर यांनी सांगितलं.