लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने बाकी आहेत. त्यामुळे देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी याबाबतीत आघाडीवर आहे. भाजपाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या पक्षाने निवडणुकीसाठीचं घोषवाक्यदेखील तयार केलं आहे. हे घोषवाक्य भाजपा पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी (२ डिसेंबर) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचं नवीन घोषवाक्य ठरवण्यात आलं. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव आणि मनसुख मांडविया उपस्थित होते.

भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अबकी बार ४०० पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य जाहीर केलं केलं आहे. आगामी निवडणुकीच्या काळात टीव्हीवर, रेडिओवर, सोशल मीडियावर, भाषणं आणि प्रचारसभांमध्ये हेच घोषवाक्य सतत आपल्या ऐकायला मिळणार आहे. यासह भाजपाने लोकसभा आणि विधानसभा स्तरावर संयोजकांची नेमणूक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा देशव्यापी दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा २२ जानेवारीपासून सुरू होईल.

भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले हैं’ आणि ‘अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा दिल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे गेली १० वर्ष देशात भाजपाप्रणित एनडीएचं सरकार काम करतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका सभेत दावा केला आहे की, देशातल्या जनतेचा भाजपावर विश्वास कायम आहे. त्यामुळे भाजपा यंदा लोकसभा विजयाची हॅटट्रिक करेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरुद्ध काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना (ठाकरे गट) आणि जनता दल युनायडेट या पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात सामना होणार आहे.