सीबीएसई बोर्डाने १२ वीच्या परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नावरुन सध्या गदारोळ सुरु आहे. समाजशास्त्राच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी सीबीएसई बोर्डाने माफीदेखील मागितली आहे. सीबीआय बोर्डाची सध्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्याच्या पहिल्या सत्रातील परीक्षा सुरु आहे. बुधवारी १२ वीचा पहिला पेपर झाला. यानंतर हा वाद सुरु झाला.

नेमका काय प्रश्न विचारला होता –

“२००२ मध्ये कोणत्या सरकारच्या कार्यकाळात गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला?,” असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता. यावेळी चार पर्याय देण्यात आले होते. भाजपा, काँग्रेस, डेमोक्रॅटिक की रिपब्लिकन यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना निवडायचा होता.

सीबीएसई बोर्डाने मागितली माफी –

“आजच्या १२ वीच्या समाजशास्त्राच्या सत्र पहिल्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा असून सीबीएसईच्या गाईडलाइन्सचा उल्लंघन करणारा आहे. सीबीएसईने झालेल्या चुकीची दखल घेतली असून यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असं सांगत सीबीएसईने माफी मागितली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, “सीबीएसईच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पेपर सेट करणाऱ्यांनी केवळ अभ्यासक्रमावर केंद्रीत करणारे तसंच लोकांच्या भावना दुखावतील असे राजकीय, सामाजिक प्रश्न विचारु नयेत असं सुनिश्चित करण्याचं सांगतात”.

दरम्यान ट्विटरवर दोन युजर्सनी विचारण्यात आलेला प्रश्न हा अभ्यासक्रमानुसार असून हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख असल्याचं म्हटलं आहे.