पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी(दि.4) उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून ‘महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे देशासाठी गेले…तर मग महाजन, मुंडे कशासाठी गेले?, असा सवाल करत भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत ट्विट केल्याचं समोर येत आहे. त्यांच्या ट्विटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मात्र, स्क्रिनशॉट व्हायरल होण्यास सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच सावंत यांनी ते ट्विट डीलिट केलं आणि दुसरं ट्विट करुन ‘जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे’, असं म्हणत ट्विट डीलिट केल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. ‘आज ज्या पातळीवर भाजपा आणि मोदी, जेटली सारखी मंडळी घसरुन राजीव गांधी वर टिका करत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. याचकरीता ट्विट केले होते…परंतु आता डिलीट करत आहे…असंस्कृतांबरोबरही संस्कृती राखणे ही भित्रेपणाचे लक्षण नसून त्यातच शौर्य असते’, अशी टीका सचिन सावंत यांनी दुसऱ्या ट्विटद्वारे भाजपावर केली आहे. पहिल्या ट्विटमुळे वादाला तोंड फुटू शकतं या शक्यतेमुळे सावंत यांनी ट्विट डीलिट केल्याचीही चर्चा आहे.


काय म्हणाले होते मोदी –

‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही’ असं विधान मोदींनी केलं होतं.

राहुल गांधींचं प्रत्युत्तर –

‘मोदीजी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही’ असं प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिलं आहे.