पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता मिळाली तर त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. ‘राहुल गांधी उत्तर प्रदेशात सपा-बसपा युतीला, केरळात डाव्यांना, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणि राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाला नुकसान पोहोचवत आहेत’, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी ही टीका केली. दिल्लीत दोन दिवसांनी मतदान होणार असून त्याआधीच अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ‘जे चित्र दिसत आहे त्यावरुन काँग्रेस भाजपाशी नाही जणू काही विरोधकांशीच लढत आहे असं दिसत आहे. काँग्रेसमुळे जुळून आलेल्या अनेक गोष्टी बिघडत आहेत’, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत प्रमुख क्षेत्रांमध्ये कोणतंही योगदान देण्यात ते असमर्थ ठरल्याचं म्हटलं आहे. यामुळेच ते खोट्या देशभक्तीचं सहाय्य घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला. ‘मोदींची देशभक्ती खोटी आहे. देशासाठी हे घातक आहे’, असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

‘आपलं कोणतंही काम दाखवण्यासाठी नसल्यानेच नरेंद्र मोदी मतं मिळवण्यासाठी लष्कराचं सहाय्य घेत आहेत’, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ‘मोदी आणि अमित शाह यांना सत्तेत येण्यापासून रोखणं आमचं एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही हे दोघे सोडून कोणालाही समर्थन देऊ’, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

आम आदमी पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. ‘भाजपा नरेंद्र मोदींच्या नावे मतं मागत असताना आप शिक्षण, आरोग्य, वीज क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर मतं मागत आहे. नरेंद्र मोदी आपण शाळा, हॉस्पिटल बांधली, वीज दर कमी केले, पिण्याच्या पाण्याची सुविधा या विषयांवर बोलू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात ते अपयशी ठरले आहेत’, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.