बेजबाबदार वर्तन आणि सामाजिक संकेतांचे पालन न केल्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची राष्ट्रीय जनता दल पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी केली. पण आता त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे येत आहेत. खासदार सुधाकर सिंह यांनी सोमवारी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.
“लग्न ही वैयक्तिक बाब आहे, पण मी ती गुन्हा मानत नाही… आम्ही राम मनोहर लोहिया यांच्या पावलावर पाऊल ठेवतो, ज्यांनी सप्त क्रांतीवरील त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की बलात्कार आणि फसवणूक वगळता पुरुष आणि स्त्रीमधील सर्व संबंध वैध आहेत. जर तेज प्रताप यांनी पुन्हा लग्न केले असेल, तर मी ते अनैतिक कृत्य मानत नाही… हिंदू परंपरेत, दोन किंवा तीन ते चार लग्न स्वीकारली गेली आहेत आणि आपण अशा प्रकरणांबद्दल ऐकले आहे. आजही असे अनेक विवाह होतात”, असं सिंह म्हणाले.
दोन-तीन लग्ने करणे गुन्हा नाही
लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) दिवंगत प्रमुख रामविलास पासवान यांच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “उदाहरणार्थ (केंद्रीय मंत्री) चिराग पासवान यांचे घ्या . ते रामविलास पासवान यांच्या दुसऱ्या पत्नीच्या पोटी जन्माला आले होते. अनेकांनी दोन किंवा तीन लग्ने केली आहेत, हे सर्वांना माहिती आहे. ही मोठी गोष्ट नाही आणि गुन्हाही नाही. वडील म्हणून लालू प्रसाद यांनी त्यांना स्वीकारले पाहिजे.”
तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक अकाऊंटवरून गेल्या आठवड्यात एक फोटो शेअर करण्यात आला होता. एका महिलेबरोबरचा तो फोटो होता. गेल्या १२ वर्षांहून अधिक काळापासून ते तिच्याबरोबर राहत असल्याचा दावा या फोटोच्या कॅप्शनमधून करण्यात आला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, लालू प्रसाद यादव यांनी तत्काळ तेज प्रताप यांची पक्षातून आणि घरातून हकालपट्टी केली. त्यांचं बेजबाबदार वर्तन कुटुंबाच्या मूल्यांशी जुळत नसल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली.
२०१८ मध्ये, तेज प्रताप यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केले. पण ते फार काळ टिकले नाही आणि दोघांनी एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सध्या हे प्रकरण पाटणा येथील कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. लालूंवर तेजच्या अफेअर्सबद्दल सर्व काही माहित असल्याचा आणि तरीही राजकीय कारणांमुळे लग्नासाठी दबाव आणत असल्याचा आरोप राय यांनी केला आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ऐश्वर्याने तिच्या विभक्त पतीच्या हकालपट्टीला “निवडणूक नाटक” म्हटल आहे.