नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, त्या वेळी भारतात सकारात्मक परिवर्तन आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा जो प्रवास सुरू झाला, त्याला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात भारताच्या सांस्कृतिक प्रबोधनाची केवळ पायाभरणी झाली नाही, तर देशाच्या संस्कृतीला पुन्हा जिवंतपणा, आकाशाएवढी उंची आणि समुद्राची खोली लाभली आहे, असे आज मी नि:संकोचपणे म्हणू शकतो.
या काळाचा साक्षीदार म्हणून मी भारावून गेलो आहे आणि मला दृढ विश्वास आहे की भारत अशीच वाटचाल करत राहील आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या वैचारिक अधिष्ठानासह जगाला नवीन दिशा देत राहील. ‘वारसा आणि विकास’ या दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनातून आज सांस्कृतिक प्रबोधनाचा ध्वज संपूर्ण जगात फडकत आहे.
रामलल्ला स्वत:च्या घरात विराजमान होणे, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे निर्माण, सोमनाथ मंदिर परिसराचे जीर्णोद्धार, महाकाल लोक कॉरिडॉरचे निर्माण, करतारपूर साहिब कॉरिडॉर, चारधाम प्रकल्पाचा विकास, बुद्ध सर्किट आणि जैन सर्किटचे निर्माण – या सर्वांद्वारे मोदी सरकारने भारताचा सांस्कृतिक वारसा एकत्र गुंफलाच; त्याच्या जोडीने त्यांनी राष्ट्राला आपल्या सांस्कृतिक ओळखीबाबत अभिमानाने उभे राहण्याची शिकवणही दिली.
देशाच्या परराष्ट्र धोरणातसुद्धा भारताच्या सांस्कृतिक मूल्यांना योग्य स्थान मिळाले. आपले पंतप्रधान जगातील कोणत्याही राष्ट्रप्रमुखांना भेटतात, तेव्हा ते त्यांना श्रीमद भगवत गीता, तुळशीचे रोप किंवा भारतीय संस्कृती व कलेशी संबंधित वस्तू भेट देतात.
आपल्या देशातील शेकडो प्राचीन मूर्ती, अष्टधातूच्या मूर्ती आणि महान कलाकृती चोरी करून परदेशात पाठवण्यात आल्या. २०१४नंतर आजपर्यंत ६४२ प्राचीन मूर्ती आणि वारसा सांगणाऱ्या वस्तू परदेशातून भारतात परत आणल्या आहेत.
योग आणि आयुर्वेदालाही गेल्या ११ वर्षांत जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. गोवंशाचे महत्त्व पुन्हा देशात अधोरेखित झाले आहे. सेंद्रिय शेती आणि ‘श्री अन्न’ यांनाही नवे वैश्विक स्वरूप प्राप्त झाले आहे.
सनातन संस्कृती म्हणजे काय? तिचे आत्मतत्त्व काय आहे? अखंड भारताची संकल्पना काय आहे? भारत अनेकतेत एकतेचा देश कसा आहे? संपूर्ण देश एकत्रित कसा गुंफलेला आहे? या सर्वांचे दर्शन या वर्षीच्या पूर्ण महाकुंभात मिळाले.
इथे मी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख अवश्य करणार आहे. आपल्या शूरवीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले, त्याने संपूर्ण जगात भारतीय राष्ट्राची एक नवी ओळख प्रस्थापित केली आहे. नि:संशयपणे, २०४७ मध्ये एक असे भारत असेल ज्याचा आपल्याला अभिमान वाटणार आहे.
– स्वामी अवधेशानंद गिरिजी महाराज, आचार्य महामंडलेश्वर (जुना आखाडा)