PM Modi Slams Terrorists: गेल्या काही दिवसांपासून भारत सातत्याने पाकिस्ताने दहशतवादापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. याबरोबर जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसणे थांबवले नाही आणि पुन्हा भारतात एखादी दहशतवादी घटना घडवली तर त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमध्ये दहशतवाद्यांना इशारा देत, जर पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या तर सापाप्रमाणे बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असे म्हटले आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज येथे एका सभेत बोलताना पंतप्रधान मेदींनी ऑपरेशन सिंदूरच्या यशावर भाष्य केले. ते म्हणाले की, “जर पुन्हा डोके वर काढेल तर भारत दहशतवाद्यांच्या रूपातील सापाला त्याच्या बिळातून बाहेर काढून चिरडून टाकेल.”

दरम्यान भारताने काही दिवसांपूर्वी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले होते.

यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या गेल्या बिहार दौऱ्यावेळी, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जातील अशी घोषणा केल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून साध्य केले आहे.

“रोहतासचे जिल्हा मुख्यालय असलेल्या सासारामच्या नावामध्ये ‘राम’ शब्द आहे. प्रभू श्रीरामांचे धोरण ‘प्राण जाये पर वचन न जाये’ असे होते. दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई थांबणार नाही. मी बिहारमधून वचन दिले होते की, पहलगाम हल्ल्यात ज्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर पुसले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आपल्या संरक्षण दलांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत,” असे त्यांनी शुक्रवारी रोहतासमध्ये पंतप्रधानांनी म्हटले.

या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने, मोदींनी उपस्थितांना जंगल राज आणि सामाजिक न्यायाचे खोटे दावे करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. “ज्यांनी गरीब आणि मागासलेल्यांसाठी काहीच केले नाही, ज्यांनी बिहारच्या लोकांना राज्य सोडण्यास भाग पाडले, ते आता सामाजिक न्यायाबद्दल बोलत आहेत,” असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिम बंगालमध्येही पाकिस्तानवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “पाकिस्तान जेव्हापासून अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून त्यांनी फक्त दहशतवादालाच पोसले आहे. दहशतवाद आणि नरसंहार ही पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी कौशल्ये आहेत. पाकिस्तानने हे समजून घेतले पाहिजे की, तीन वेळा घरात घुसून मारले आहे. बंगाल टायगरच्या भूमीतून १४० कोटी भारतीयांची घोषणा आहे की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही.”