Mallikarjun Kharge on Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी जम्मू आणि काश्मीरमधील संभाव्य हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपला दौरा रद्द केला, असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. हा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला झाला, असेही खरगे म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, गुप्तचर यंत्रणेत त्रुटी राहिली असून सरकारने ती मान्य केली आहे. सरकारकडून पुढील काळात त्यावर उपाय योजले जातील. पण जर हल्ला होणार हे आधीपासून माहीत होते, तर त्यावर काहीच का केले गेले नाही? मला मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळेच त्यांनी आपला काश्मीर दौरा रद्द केला. वर्तमानपत्रातूनही हे वाचायला मिळाले आहे.”
सरकारनेही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याचे मान्य केले असून पुढील काळात त्यावर काम करू, असे आश्वासन दिले आहे. पण आमचा प्रश्न असा आहे की, संभाव्य धोक्याबाबत तुम्हाला आगाऊ माहिती मिळाली असताना सुरक्षेचे योग्य ते उपाय का राबविले गेले नाहीत?, असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.
पहलगाम हल्ल्यानंतर २४ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारनेही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली होती.
सर्पपक्षीय नेत्यांच्या बैठकीत विरोधकांनी सुरक्षेसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरण पर्वतातील कुरण पर्यटकांसाठी खुले केले आहे, ही माहिती पहलगाम स्थानिक प्रशासनाने सुरक्षा यंत्रणांना दिली नव्हती. जूनमधील अमरनाथ यात्रा होईपर्यंत हे कुरण बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते.
पहलगाम येथील हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी गुप्तचर यंत्रणांनी पर्यटकांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा धोक्याचा इशारा दिला होता. विशेष करून श्रीनगर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल्सना लक्ष्य केले जाऊ शकते, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी करणार होते रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन
एप्रिल महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदींचा जम्मू आणि काश्मीरचा दौरा ठरला होता. कटरा ते श्रीनगर या रेल्वे मार्गावरील रेल्वेला ते झेंडा दाखवणार होते. १९ एप्रिल रोजी नियोजित असलेला हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. कटरा परिसरात वाऱ्याचा वेग वाढला असल्याचे कारण देत सदर दौरा पुढे ढकलण्यात आला होता.