भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्याचा खुलासा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शुक्रवारी केला. कॅनडातील अल्बर्टा येथे १५ ते १७ जून यादरम्यान ही शिखर परिषद होत आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी कार्नी यांनी मोदी यांना आमंत्रित केले असून मोदी यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या कार्नी यांनी हे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, भारताला जी-७ शिखर परिषदेचे आंमत्रण मिळण्यास उशीर झाल्यामुळे मोदी कॅनडाला जाणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. यादरम्यान, शुक्रवारी कॅनडाकडून आमंत्रण देण्यात आले आणि ते स्वीकारले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीरही केले.

ओट्टावा येथील पार्लमेंट हिल येथे पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या आमंत्रणाबद्दल प्रश्न विचारले असता कार्नी यांनी उत्तर दिले की, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आणि पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जी-७ला उपस्थित असायला हवी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी-७ गटाचा अध्यक्ष म्हणून ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वाची खनिजे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील चर्चांना उपस्थित राहण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या देशांना आमंत्रित करणे महत्त्वाचे आहे. भारत हा जागतिक साखळी पुरवठ्याच्या खरोखर केंद्रस्थानी असलेला देश आहे. – मार्क कार्नी, पंतप्रधान, कॅनडा