निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे त्यांच्या निवडणुकांसंदर्भातल्या विश्लेषणासाठी आणि डावपेचांसाठी ओळखले जातात. देशात एकीकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीनं रंगत निर्माण केली आहे. त्यामुळे नेमकं २०२४ साली देशात काय चित्र असेल, याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा चालू आहे. प्रशांत किशोर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये बोलताना सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केलं. काँग्रेसनं भाजपाला नमवण्याच्या संधी वारंवार गमावल्याचा उल्लेख करताना प्रशांत किशोर यांनी २०१५सालच्या घडामोडी नमूद केल्या.

काँग्रेसनं गमावलेल्या तीन संधी!

प्रशांत किशोर यांनी यावेळी काँग्रेसनं गेल्या १० वर्षांत भाजपाला नमवण्याच्या तीन संधी गमावल्याचं सांगितलं. “२०१५मध्ये भाजपाचा दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसनं भाजपाला पुनरागमन करू दिलं आणि आसाममध्ये त्यांचा विजय झाला. २०१७मध्ये काँग्रेसनं नितीश कुमार शिवसेना या भाजपाच्या मित्रांना सोबत घेण्यास नकार दिला. तर २०२१ मध्ये करोना काळात भाजपाचा बंगालमध्ये पराभव झाल्यानंतरही काँग्रेसनं काहीही केलं नाही”, असं प्रशांत किशोर यांनी नमूद केलं.

२०१५ सालच्या घडामोडी!

दरम्यान, २०१५ साली जेव्हा काँग्रेसनं आसाम गमावलं, तेव्हाच्या घडामोडींचा प्रशांत किशोर यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. “२०१५मध्ये बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला. त्याचवर्षी जानेवारीत त्यांचा दिल्लीतही पराभव झाला. पूर्ण वर्ष भाजपानं एकही निवडणूक जिंकली नाही. भाजपाचे तेव्हाचे काही वरीष्ठ नेते माध्यमांसमोर गेले आणि त्यांनी थेट भाजपाच्या वरच्या फळीतील नेतृत्वावर, पक्ष ज्या प्रकारे चालवला जात होता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. चार महिन्यांनी भाजपाचा पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्येही पराभव झाला. फक्त आसाममध्ये त्यांना विजय मिळवता आला”, असं प्रशांत किशोर यांनी नमूद केलं.

आसाममध्ये काँग्रेसला फक्त एकच गोष्ट करायची होती.गोगोई व हिमंता बिस्व सरमा यांच्यातील वाद अधिक चांगल्या प्रकारे हाताळायचा होता. टेनिसच्या पाच तासांच्या सामन्यात फक्त एक पॉइंट असा होतो जो तुम्ही गमावता आणि सामना हरता. ते त्यांनी केलं नाही आणि भाजपाला आसाममध्ये विजय मिळवण्याची संधी मिळाली”, असं गणित प्रशांत किशोर यांनी मांडलं.

“आम्ही अक्षरश: काँग्रेसकडे भीक मागत होतो”

यावेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला समजावण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केल्याचं सांगितलं. “मला हे स्पष्ट आठवतंय. त्यावेळी मी आणि नितीश कुमार काँग्रेसच्या नेत्यांना भेटत होतो. आम्ही त्यांच्याकडे अक्षरश: भीक मागत होतो की कृपा करून तुमची सगळी ताकद आसाममध्ये पणाला लावा. भाजपाला आसाममध्ये विजय मिळता कामा नये. जर ते घडलं, तर तो खूप मोठा धक्का असेल. पण त्यांनी एकत्रपणे प्रयत्न केले नाहीत. आसाममध्ये विजय मिळवणं किंवा आसाम भाजपापासून राखणं हे त्यावेळी फक्त काँग्रेसच्या हातात होतं”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

“भाजपाला हरवण्याच्या ३ मोठ्या संधी विरोधकांनी गमावल्या”, प्रशांत किशोर यांनी मांडलं गेल्या १० वर्षांचं गणित!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे असं अजिबात म्हणू नका की भाजपा कधीच दबावाखाली नव्हती, लोक पूर्णपणे भाजपाच्या पाठिशी आहेत वगैरे. पहिल्या दिवसापासून भाजपाविरोधातील लोकांनी विरोधी पक्षांना संधी दिली. फक्त विरोधक त्या संधीचं सोनं करू शकले नाहीत. त्यामुळेच आजची ही स्थिती आहे”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी विरोधकांच्या चुकांवर बोट ठेवलं.