उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा रामविरोधी (श्री रामाचे विरोधक) आहे, अशी टीका केली होती. आदित्यनाथ यांच्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदित्यनाथ यांचा ‘रावण’ असा उल्लेख केला होता. पटोले यांनी आदित्यनाथ यांची थेट रावणाशी तुलना केली. ते म्हणाले, “रावण सीता मातेला पळवून नेण्यासाठी भगवे कपडे परिधान करून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येत आहेत.” पटोले एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “योगी असो अथवा भाजपाचे इतर नेते, ते केवळ काँग्रेसवर टीका करत असतात. परंतु, देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, चीनचं भारताच्या सीमेवरील अतिक्रमण, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत.”

नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे आदित्यनाथ यांची बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आठवले यांनी नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच ते म्हणाले, रावण खूप डॅशिंग (हिंमतवान) होता म्हणून पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांना रावणाची उपमा दिली असेल. किंवा रावणाने लंका जाळली होती आणि योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुंडाराज संपवला आहे, या गोष्टीचा संदर्भ देऊन नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांना रावण म्हटलं असेल. मात्र पटोले यांनी अशा प्रकारे आदित्यनाथ यांना रावणाची उपमा देणं योग्य नाही.

हे ही वाचा >> “देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?” ‘त्या’ विधानावरून अनिल देशमुखांचा सवाल!

रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

रामदास आठवले म्हणाले, मला असं वाटतं की प्रत्येक सभेत सर्व गोष्टींवर, मुद्द्यांवर बोलता येत नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांना रावण म्हणणं ठीक नाही. रावण खूप डॅशिंग होता म्हणून कदाचित पटोले योगी आदित्यनाथ यांना रावण म्हणाले असतील. रावणाने लंका जाळली होती, या गोष्टीचा त्यांना संदर्भ द्यायचा असेल. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मधील गुंडाराज संपवला आहे, त्यामुळे नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांना अशा पद्धतीची उपमा दिली असेल. मात्र हे ठीक नाही, योगींना रावण बोलणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ हे विकासाच्या मुद्द्यावर बोलतात, चीनच्या अतिक्रमणावर बोलतात. परंतु, परंतु, प्रत्येक सभेत या सगळ्या विषयांवर बोललंच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे नाना पटोले यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही.