राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार वेलमध्ये उतरुन घोषणा देत होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी  गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले.

अध्यक्षांनी या सदस्यांना आपापल्या ठिकाणी परत जाण्याचे आणि कार्यवाही पुढे जाऊ देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सभासदांसमोर आलेल्या आणि फलक दाखवणाऱ्या सदस्यांची नावे नियम २५५ अन्वये प्रकाशित केली जातील आणि त्यांना दिवसभर निलंबित केले जाईल. तरी देखील गोंधळ थांबला नाही. त्यानंतर अध्यक्षांनी गोंधळ निर्माण करणाऱ्या सदस्यांना नियम २५५ अंतर्गत सभागृह सोडण्यास सांगितले.

हेही वाचा- ‘हे बोगस लोक’; संसदेच्या दारातच काँग्रेस-अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक

राज्यसभेने दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार डोला सेन, नदिमुल हक, अर्पिता घोष, मौसम नूर, शांता छेत्री आणि अबीर रंजन बिस्वास यांना अव्यवहार्य वर्तनासाठी आजच्या सभागृहाच्या कामकाजामधून माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ६ टीएमसी खासदारांच्या विरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, सहा टीएमसी खासदारांचे वर्तन सभागृहात पूर्णपणे अव्यवस्थित होते आणि म्हणूनच त्यांना सभापतींनी नियम २५५ अंतर्गत कामकाज सोडून त्वरित वॉकआउट करण्याचे निर्देश दिले आहेत.