तृणमूल काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकट्यानेच लढवण्याचा निर्णय घेतला असून नुकतेच या पक्षाने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय. गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीचा भाग म्हणून तृणमूल आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू होती. मात्र कोणताही ठोस तोडगा निघत नसल्यामुळे तृणमूल काँग्रेसने सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. तृणमूलच्या सर्वसर्वा ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

“कोणतीही एकतर्फी घोषणा नसावी, हीच…”

तृणमूल काँग्रेसने सर्व जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करताच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिलीय. तृणमूलच्या या निर्णयावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. “काँग्रेस पक्षाने तृणमूल काँग्रेसशी पश्चिम बंगालमध्ये समाधानकार आणि आदरयुक्त जागावाटपाची इच्छा वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. जागावाटपाचे सूत्र हे सविस्तर चर्चेतून ठरवले जावे. कोणतीही एकतर्फी घोषणा नसावी, हीच काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. भाजपाविरोधात इंडिया आघाडीने एकत्रितपणे लढा द्यावा असेच काँग्रेसला नेहमी वाटते,”अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी एक्सच्या माध्यमातून दिली.

अभिषेक बॅनर्जी, क्रिकेटपटू युसुफ पठाण यांना उमेदवारी

तृणमूल काँग्रेसने आज (१० मार्च) पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये कृष्णानगर येथून महुआ मोईत्रा यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर तृणमूल काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी, क्रिकेटपटू युसुफ पठाण यांनादेखील तृणमूलने उमेदवारी दिलीय.

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेस पक्षाला तृणमूल पक्ष अवघ्या दोन जागा देण्यास तयार होता. तर काँग्रेसला आणखी जागा हव्या होत्या. जागावाटपावर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत, अशी घोषणा केली होती. तसेच आमची इंडिया आघाडीशी जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा चालू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर संयमाची भूमिका घेत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. या चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नसल्यामुळे आता शेवटी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.