पीटीआय, नवी दिल्ली

गेल्या ११ वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिलाकेंद्रित विकासाला महत्त्व दिले असून सर्व क्षेत्रांमध्ये देशातील महिला चांगली कामगिरी करून अनेकांना प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज, सोमवारी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी विविध योजनांवर प्रकाश टाकला.

महिलांना मोठा फायदा झालेल्या अनेक कल्याणकारी कार्यक्रमांचा उल्लेख करतानाच ‘स्वच्छ भारत’ मोहिमेद्वारे प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यापासून ते जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेशापर्यंत, विविध उपक्रम महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दलांसह सर्व क्षेत्रात महिला उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि अनेकांना प्रेरणा देत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी सरकार चालवणाऱ्या नागरिक सहभाग असलेल्या व्यासपीठाचा दाखला दिला. यात अनेक सरकारी योजनांमधून महिलांना मिळणाऱ्या फायद्यांची यादी देण्यात आली होती. उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेंतर्गत १० कोटींहून अधिक कनेक्शन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

‘उज्ज्वला योजने’मुळे गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडरवर चालणारे धुरमुक्त स्वयंपाकघर मिळाले, तर ‘मुद्रा’ कर्ज योजनेमुळे लाखो महिला उद्याोजकांना स्वत:च्या अटींवर स्वप्ने पूर्ण करता आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर बांधलेल्या घरांचाही उल्लेखनीय परिणाम झाला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाने मुलींच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय चळवळ प्रज्वलित केली.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘थेट उत्तरे देण्याची हिंमत नाही’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ पत्रकारांच्या थेट प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत नसल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. प्रत्येक देशाचे प्रमुख वेळोवेळी पत्रकार परिषदा घेतात. परंतु आपल्या पंतप्रधानांना थेट प्रश्नांना तोंड देऊन ११ वर्षे झाली, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर लगावला.