Sharad Pawar on Dhananjay Munde Parli Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) परळी येथे एका प्रचारसभेला संबोधित केलं. येथील त्यांच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत बोलताना पवारांनी परळीचे विद्यमान आमदार व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, “काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटकाळात मदतीची आवश्यकता होती. त्या त्या वेळी त्यांना माझ्याकडून मदत केली गेली. मात्र सत्ता आल्यावर सत्ता त्यांच्या डोक्यात गेली. यामुळे जनतेचं मोठं नुकसान झालं”.

शरद पवार म्हणाले, “मला आठवतंय माझ्याच एका सहकाऱ्याने धनंजय मुंडे यांची माझ्याबरोबर भेट घालून दिली होती. मी त्यांना राजकारणात संधी दिली. बीड जिल्ह्यामध्ये लोकांसाठी काम करणारं एक नेतृत्व तयार होईल या अपेक्षेने मी त्यांना संधी देत गेलो. त्यांना पक्षात घेतलं, संघटनेत जबाबदारी दिली, विधान परिषदेत आमदार म्हणून पाठवलं, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केलं. पुढे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही सहभागी करून घेतलं. त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं केलं. मात्र, सत्ता आल्यावर ती त्यांच्या डोक्यात गेली”.

हे ही वाचा >> Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख म्हणाले, “त्यांना (धनंजय मुंडे) वेळोवेळी संधी देताना डोक्यात एकच विचार होता. परळी सारख्या भागात, बीडसारख्या जिल्ह्यात असा एखादा नेता तयार व्हायला हवा जो लोकांची कामं करेल, कारण या जिल्ह्याने एकेकाळी मला खूप सहकार्य केलं आहे. या जिल्ह्याने माझ्या पक्षाला सर्व आमदार दिले. सर्व मतदारसंघात आमचे उमेदवार निवडून देण्याचं सहकार्य या जिल्ह्याने केलं आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात लोकांची सेवा करणारा प्रतिनिधी देणं ही आमची जबाबदारी आहे, असं मला वाटत होतं. म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देत गेलो”.

हे ही वाचा >> महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीडमध्ये गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत : शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “दुर्दैवाने परिस्थिती बदलली, सत्ता आली. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते. परंतु काही लोकांना सत्ता दिल्यानंतर ती सत्ता त्यांच्या डोक्यात जाते. असंच काहीसं इथेही घडलं. फार लवकर त्यांच्या डोक्यात सत्ता गेली. त्याचाच परिणाम आज जिल्ह्यावर होतोय. जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. परंतु त्या प्रश्नांसाठी उभा राहणारा कोण आहे का इथे असं विचारल्यावर कोणीच सांगायला तयार नाही. जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. सामान्य जनतेला त्रास देण्याचे प्रकार चालू आहेत. हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन शक्ती उभी केली पाहिजे.