History of air india airline crashes अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानात एकूण २४२ लोक होते. दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटीश, एक कॅनडा आणि पोर्तुगालचे सात नागरिक होते.

जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमान अपघातात सर्व २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या अपघाताच्या दृश्यांमध्ये घटनास्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत होते. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही एअर इंडिया विमानाचे अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांचा इतिहास जाणून घेऊयात.

विमान अपघातात सर्व २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टीम)

कोझिकोड अपघात – २०२०

  • ७ ऑगस्ट २०२० मध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस बोईंग ७३७ कोझिकोड येथे टेबलटॉप धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले.
  • हे विमान दुबईहून आले होते आणि वंदे भारत कार्यक्रमाचा भाग होते. वंदे भारत कार्यक्रमांतर्गत करोना काळात विदेशातून भारतीयांना परत आणले जात होते.
  • विंग कमांडर दीपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या विमानात १९१ प्रवासी होते.
  • या विमानाने विमानतळाभोवती अनेक वेळा प्रदक्षिणा घातल्या होत्या. मुसळधार पाऊस असल्याने धावपट्टीवर उतरण्याचा दोन वेळा प्रयत्नही केला होता.
  • या घटनेत दोन्ही वैमानिकांसह २१ जणांचा मृत्यू झाला होता.

मंगळुरू अपघात – २०१०

  • २२ मे २०१० मध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट ८१२ चा लँडिंगदरम्यान अपघात झाला होता.
  • हे विमान मंगळुरूजवळील तन्निरभावी येथे कोसळले होते.
  • या विमानात कर्मचाऱ्यांसह १६६ जण होते. या अपघातात १५८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
  • मृतांपैकी १२ जणांची ओळख पटू शकली नाही, त्यामुळे त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • या अपघातातून केवळ आठ जण बचावले. हा अपघात भारतातील अलीकडच्या इतिहासातील सर्वात वाईट विमान अपघातांपैकी एक होता.
  • तज्ज्ञांचे सांगणे आहे की, टेबल-टॉप धावपट्टी वैमानिकांसाठी नेव्हिगेट करणे कठीण आहे, त्यामुळे कधीकधी वैमानिकांचा लॅंडिंगचा अंदाज चुकू शकतो.

कनिष्कवर बॉम्बस्फोट – १९८४

  • ‘कनिष्क’ फ्लाइट १८२ वर भारतातील सर्वात भयानक दहशतवादी हवाई हल्ला झाला होता.
  • २३ जून १९८५ मध्ये मॉन्ट्रियलहून नवी दिल्लीला जाणाऱ्या बोईंग ७४७-२३७बी या विमानाचा आयर्लंडच्या किनाऱ्यावर स्फोट झाला.
  • हिथ्रो विमानतळावर नियोजित थांब्यापासून ते फक्त ४५ मिनिटांच्या अंतरावर होते.
  • विमानातील सर्व ३२९ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. त्यात बहुतांश भारतीय वंशाचे कॅनेडियन होते.
  • विमानात एका सुटकेसमध्ये आणलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला होता.
  • १९८४ मध्ये पंजाबमधील सुवर्ण मंदिरावर झालेल्या भारतीय सैन्याच्या प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शीख फुटीरतावाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता.
  • त्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले होते.

अरबी समुद्रातील अपघात – १९७८

  • १ जानेवारी १९७८ रोजी एअर इंडियाचे विमान ८५५ मुंबई किनाऱ्यावरून खाली येत अरबी समुद्रात कोसळले.
  • दुबईला जाणारे विमान रात्री ८ वाजता मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावरून उड्डाण घेत होते, तेव्हा हा अपघात झाला.
  • विमानातील उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची दिशाभूल झाली आणि हा अपघात झाला.
  • या अपघातात विमानातील सर्व २१३ जणांचा तात्काळ मृत्यू झाला.

अरबी समुद्र अपघात – १९७६

  • १२ ऑक्टोबर १९७६ रोजी एअर इंडियाचे विमान १७१ मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर कोसळले.
  • एअर इंडियाचे कॅराव्हेल हे विमान मद्रासला जात असताना त्याच्या इंजिनला आग लागली.
  • विमानात ९५ जण होते, त्यात ८९ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

स्वित्झर्लंडमधील अपघात – १९६६

  • एअर इंडियाचे १०१ माँट ब्लँक विमान ४ जानेवारी १९६६ रोजी पर्वतांमध्ये कोसळले.
  • बोईंग (कांचनजंगा) या विमानात ११७ प्रवासी आणि मुख्य म्हणजे अणुभौतिकशास्त्रज्ञ आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक होमी जे भाभा यांचादेखील समावेश होता.
  • मुंबईहून दिल्ली, बेरूत आणि जिनेव्हा मार्गे लंडनला जाणारे हे विमान का कोसळले याचे कारण आजही अस्पष्ट आहे.
  • या अपघातात होमी भाभा यांच्या मृत्यूनंतर हा अपघात एका कटाचा भाग असल्याचे सांगितले जात होते.

स्वित्झर्लंड अपघात – १९५०

  • १९५० मध्ये फ्रेंच-इटालियन सीमेवरील मोंट ब्लँक प्रदेशातही एक अपघात घडला होता.
  • एअर इंडिया एक्स्प्रेस २४५ या विमानाचे नाव त्यावेळी ‘मालाबार प्रिन्सेस’ असे होते.
  • हे विमान मुंबईहून लंडनला जात होते.
  • विमान मध्यंतरी एक थांबा घेऊन कैरोहून निघाले होते आणि जिनेव्हा येथे उतरणार होते.
  • या अपघातात विमानातील सर्व ४८ प्रवाशांचा मृत्यू झाला.