महालेखापरीक्षण अहवालात काय?

भारतीय लष्करातील ‘रीमाउंट अँड व्हेटर्नरी कोअर’ या विभागाच्या प्राणी-प्रशिक्षण उद्दिष्टांपैकी केवळ अर्धेच उद्दिष्ट साध्य करण्यात आले असून या प्राण्यांमार्फत वाहतूक करण्यासाठीच्या ‘अॅनिमल ट्रान्सपोर्ट युनिट’चा पूर्णपणे वापर करण्यात लष्कर अयशस्वी ठरले, असा ठपका भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) संरक्षण सेवांवर नुकत्याच केलेल्या लेखापरीक्षणात आहे. भारतीय सैन्यातील घोड्यांचे आणि श्वानांचे प्रजनन, प्रशिक्षण आणि आरोग्य व्यवस्थापन यांत संबंधित विभाग अपयशी ठरल्याचा ठपकाही या अहवालाने ठेवला आहे. २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीचा हा लेखापरीक्षण अहवाल नुकताच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आला. भारतीय सैन्यातील घोड्यांची क्षमता सुधारण्यासाठी युरोपीय देशांमधून उच्च प्रतीच्या घोड्यांचे गोठलेले वीर्य आयात करणे तसेच ड्रोन आणि निरीक्षण साधने शोधून निकामी करणाऱ्या ‘रॅप्टर’ पक्ष्यांचे (ससाणे, गरुड आदी) प्रशिक्षण आणि स्थानिक जातीच्या कुर्त्यांचे प्रशिक्षण एकतर साध्य झाले नाही किंवा कमी साध्य झाले असेही या अहवालात नमूद आहे.

सैन्यदलात घोडे आणि खेचर कशासाठी?

सैन्यदलातील ‘प्राणी वाहतूक युनिट’मार्फत, चढण्यासाठी कठीण असलेल्या प्रदेशात दारुगोळा, अन्नधान्य यासारख्या आवश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी घोडे आणि खेचर वापरले जातात. ‘प्राणी वाहतूक युनिट’ हे इंडो-तिबेटन सीमा पोलिसांच्या सर्व सीमा रक्षक युनिट्सचा अंगभूत भाग आहे. आव्हानात्मक स्थितीत दुर्गम प्रदेशात रसद साखळीतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून हे प्राणी वाहतूक युनिट महत्त्वाचे आहे. मात्र, या खेचरांना आता सेवानिवृत्त करण्यात येत असून त्यांच्या सेवेबद्दल त्यांना प्रशंसापत्रे आणि मोबदला देण्यात येईल.

हेही वाचा : महाराष्ट्रातील शासकीय बंगल्यांना नावे देण्याची परंपरा नेमकी काय आहे?

प्राणी वाहतुकीला आता कशाचा पर्याय?

भारतीय सैन्याने लष्करी सामग्रीची वाहतूक करण्यासाठी आता खेचरांऐवजी रसद पुरवठा करणारे ड्रोन तयार करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याने २०२५ पर्यंत त्यांचा संपूर्ण प्राणी वाहतूक ताफा बंद करण्याची योजना आखली आहे. आतापर्यंत त्यांनी खेचरांची संख्या दीड हजाराने कमी केली आहे. तर तीन हजार ३०० हून अधिक खेचरे जानेवारीच्या सुरुवातीला निवृत्त केली जातील. या खेचरांना ‘सामान्य सेवा खेचर’ असा दर्जा होता आणि त्यांच्यामार्फत इंधन, पाणी आणि दारूगोळा वाहतूक केली जात होती. त्याऐवजी आता, रसद पुरवणाऱ्या ५६३ ड्रोनसाठी भारतीय सैन्याने सुमारे ३२० कोटी रुपये दिले आहेत. ही मानवरहित यंत्रणा सुमारे १२ हजार फूटपेक्षा अधिक उंचीच्या भागात भार वाहून नेण्यास सक्षम असेल.

हेही वाचा : अब्जावधी वर्षांचं काम मिनिटांत होणार? ‘Google Willow’ चिप काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैन्यदलात प्राण्यांचा वापर कधीपासून?

१९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा दोन्ही बाजूंनी घोडदळाचे मोठे सैन्य होते. संपूर्ण युद्धात विशेषत: वाळवंटातील मोहिमांमध्ये घोडे आणि उंटावर बसवलेले सैन्य वापरले गेले. जखमींवर उपचार करण्यासाठी स्थापन केलेल्या वैद्याकीय सेवांच्या मोठ्या नेटवर्कचा भाग घोडे आदी प्राण्यांवरच अवलंबून होता. खडबडीत भूभागामुळे किंवा रस्ते खराब स्थितीत असताना जखमींना बाहेर काढण्यासाठी जनावरांचा वापर केला जात असे. पहिल्या महायुद्धादरम्यान घोडे, गाढव आणि खेचर यासारखे प्राणी आवश्यक युद्धसामग्री वितरित करण्यासाठी वापरले जात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात घोडे, खेचर, गाढवे, बैल आणि अगदी हत्तींचा वापर केला जात होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या बॉम्ब हल्ल्यामुळे पसरलेले अवशेष साफ करून वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर करण्यात आला. पहिल्या महायुद्धादरम्यान शोध आणि बचाव श्वान जखमी सैनिकांना शोधण्यासाठी ‘नो मॅन्स लँड’मध्ये बाहेर पडायचे. कुत्रे त्यांच्या संवेदनशील श्रवणशक्तीसह वासाच्या तीव्रतेसाठी ओळखले जातात. याचा वापर भारतीय सैन्याने विसाव्या शतकात भूसुरुंग आणि लपवून ठेवलेली स्फोटके उपकरणे शोधण्यासाठी केला. याखेरीज कीटकांची शिकार करण्यासाठी आणि खंदकांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी उंदीर, मांजरी आणि कधी श्वानांनाही प्रशिक्षित करण्यात आले होते. युद्धाच्या संकटात मनोबल वाढवण्यासाठी काही प्राणी शुभंकर म्हणून ठेवण्यात आले होते. ते सैन्यासाठी शुभेच्छा आणतात अशा (अंध)श्रद्धेने त्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली.