गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यंदा सुखकर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सालाबादप्रमाणे यंदाही महामार्गावर वाहतूक कोडींचे विघ्न प्रवाशांना अनुभवायला मिळाले. आता तर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच कबूल केल्यामुळे दोन वर्षे तरी हे विघ्न सहन करावे लागणार आहे. मुळात दरवर्षी महामार्गावर कोंडीची समस्या का होते, याचा आढावा…

पुन्हा एकदा कोंडीच कोंडी…

गणेशोत्सवासाठी बुधवारी रात्री गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघाले. मुंबईतून दीड हजाराहून अधिक एसटीच्या बसेस कोकणच्या दिशेने सोडण्यात आल्या होत्या. या शिवाय खाजगी वाहनेही हजारोच्या संख्येने तळ कोकणात जाण्यासाठी बाहेर पडली. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली. माणगाव तालुक्यातील लोणेरेजवळ महामार्गावर कोंडी निर्माण झाली. दोन्ही मार्गिकांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे वाहतूक ठप्प झाली. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते.

हे ही वाचा… महाराष्ट्रात जागावाटपापूर्वी भाजपला पक्षांतराची चिंता? २३ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये नाराजी का?

कोंडीमुक्तीसाठी कोणत्या उपाययोजना?

महामार्गाची कामे अनेक ठिकाणी रखडली आहेत. या कामांसाठी चुकीचे कंत्राटदार नेमले गेल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच दिली. तशात महामार्गावर पावसाळ्यात खड्ड्यांची समृद्धी असते. गणेशोत्सव जवळ आला, की प्रशासकीय यंत्रणा आणि राज्यकर्ते यांना महामार्गाच्या रखडलेल्या कामांची आठवण होते. मग पाहणी दौरे सुरू होतात. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र रस्त्याच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः महामार्गाच्या कामाची पहाणी केली होती. जिओ पॉलीमर टेक्नो पॅच, रॅपिड क्विक हार्डनर, डीएलसी तंत्रज्ञान पद्धत आणि प्रिकास्ट पॅनल यांचा वापर करून खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले होते. १२ कोटी रुपये या कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे रखडली आहेत, तेथे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्तीचे प्रयत्न झाले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर रायगड हद्दीत ६०० पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियमनासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली होती. माणगाव आणि इंदापूर येथे एसटीची बस स्थानके तात्पुरत्या स्वरूपात शहराबाहेर हलवण्यात आली होती.

वाहतूक कोंडीची ठिकाणे कोणती?

गेल्या १३ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. कासू ते नागोठणे, वाकण ते कोलाड, इंदापूर, माणगाव आणि लोणेरे येथे महामार्गाची कामे अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. यामुळे या पट्ट्यात सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. इंदापूर, माणगाव येथे बाह्यवळण मार्गाचे काम रखडले आहे. येथील कंत्राटदार काम सोडून निघून गेल्याने बाह्यवळण रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. कोलाड, नागोठणे, लोणेरे येथे उड्डाणपुलांची कामे अपूर्णावस्थेत आहे. यामुळे महामार्गावर कोलाड, इंदापूर, माणागव, लोणेरे ही वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे बनली आहेत. यंदा रस्ता बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत झाला होता. मात्र या सर्व उपाययोजनानंतरही वाहतूक कोंडी होतेच आहे.

हे ही वाचा… युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?

अवजड वाहतूक बंदी का फसली?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली जाते. या काळात पर्यायी मार्गांवरून अवजड वाहतूक वळविण्याचे निर्देश दिले जातात. मात्र बंदी काळात अवजड वाहनांची वर्दळ महामार्गावरून सर्रास सुरू राहते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. यावर्षीही ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र हे बंदी आदेश झुगारून अनेक अवजड वाहने रस्त्यावर आली. ही मोठी वाहने वाहतुकीसाठी मोठा अडसर ठरत होती. त्यामुळे अवजड वाहतूक बंदी फसल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. अवजड वाहतूक बंदीचे दरवर्षी कागदोपत्री सोपस्कार केले जातात. प्रत्यक्ष या आदेशाची अमंलबजावणी प्रभावीपणे आणि गांभीर्याने होत नाही.

कोणत्या उपाययोजना गरजेच्या?

कोंडी टाळायची असेल, तर आधी माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे मार्गी लावायला हवीत. पूर्वी वडखळ हे वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण होते. अरुंद रस्ता, बाजारपेठ आणि रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत होती. ही बाब लक्षात घेऊन वडखळ येथे बाह्यवळण मार्ग काढण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यापासून वडखळ येथील महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघाली. त्यामुळे इंदापूर आणि माणगावच्या बाह्यवळण मार्गांची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर कोलाड आणि लोणेरे येथील उड्डाणपुलांचे काम तातडीने पूर्ण व्हायला हवे. अवजड वाहतूक बंदीचे तंतोतंत पालन व्हायला हवे. लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई व्हायला हवी. चालकांचा आततायीपणा हेदेखील कोंडीच्या समस्येचे एक प्रमुख कारण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

harshad.kashalkar@expressindia.com