Eid banned in Pakistan for Ahmadiyya Muslim पाकिस्तान ७ जूनला (शनिवारी) ईद अल अधा (ईद-उल-अजहा असेही म्हटले जाते) साजरी करण्याची तयारी करत आहे. यानिमित्त देशात अनेक उत्सव, मेळावे आणि सार्वजनिक नमाज पठणाचे आयोजन केले जाणार आहे. ईद अल अधा हा सण धु अल-हिज्जा (म्हणजेच तीर्थयात्रेचा महिना) या महिन्याच्या १० व्या दिवशी साजरा केला जातो, याचा अर्थ ‘बलिदानाचा उत्सव’ असा होतो. मुस्लिमांमध्ये याचे खूप महत्त्व आहे. मात्र, याच्याच पार्श्वभूमीवर पंजाब आणि सिंध प्रांतात मोठी आणि आश्चर्यकारक स्वरूपाची कारवाई केली जात आहे.
२० लाख अहमदियांना कसं छळलं जातंय?
- दंड, पोलिसांचा छळ आणि तुरुंगवासाच्या धमक्या देऊन धार्मिक सण साजरा करण्यापासून रोखले जात आहे.
- मुस्लीम असूनही पाकिस्तानमध्ये अहमदियांना इस्लामिक विधी करण्यास कायद्याने मनाई आहे.
- या वर्षी ईदच्या आधी पोलिस अधिकाऱ्यांनी समुदायावर दबाव वाढवला आहे.
- या समुदायातील अनेकांना हा सण साजरा करणार नाही अशी शपथपत्रे स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जात आहे.
परंतु, यामागील नेमके कारण काय? मुस्लिमांना ईद साजरी करण्यापासून नक्की का रोखले जात आहे? जाणून घेऊयात.

ईद साजरी केल्यास पाच लाखांचा दंड
पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, कोणताही अहमदिया व्यक्ती ईदची नमाज अदा करताना किंवा पारंपरिक बलिदान देताना आढळल्यास त्याला मोठा दंड होऊ शकतो. हा दंड पाच लाख रुपयांपर्यंत आहे. काही भागात तर घरात खाजगीरित्या धार्मिक विधी पाळणेदेखील बेकायदा ठरवण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि सिंधमधील अनेक अहमदी मुस्लिमांना या बंदीचे उल्लंघन करून ईद साजरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. मानवाधिकार वॉचडॉग अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने जून २०२४ च्या अहवालात म्हटले आहे की, ईद उत्सवाला आळा घालण्यासाठी पंजाब प्रांतात अहमदिया मुस्लीम समुदायाच्या किमान ३६ सदस्यांना मनमानीपणे अटक करण्यात आली होती.
अहमदिया मुस्लिमांचा छळ
पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांवरील छळाचे मूळ कायदेशीर आणि संवैधानिक बहिष्कारांमधून येते. याचाच अर्थ असा की, १९७४ मध्ये झालेल्या हिंसक दंगलींनंतर तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी संविधानात सुधारणा करून अहमदिया मुस्लीम समुदायाला गैर-मुस्लीम घोषित केले होते. १९८० च्या दशकात जनरल झिया-उल-हक यांच्या राजवटीत एका अध्यादेशाद्वारे या निर्णयाला नंतर बळकटी देण्यात आली होती. या अध्यादेशात अहमदिया धार्मिक अभिव्यक्तीला पूर्णपणे गुन्हेगार ठरवण्यात आले.
सध्याच्या पाकिस्तानी कायद्यानुसार, जो कोणी अहमदिया मुस्लीम त्यांच्या प्रार्थनास्थळाला मशीद म्हणत, इस्लामिक नमाज पठण करून किंवा पारंपरिक इस्लामिक अभिवादन वापरून मुस्लीम असल्याचे सांगतो किंवा आढळून येतो, त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मानवाधिकार गटांनी वारंवार या कायद्यांचा निषेध केला आहे. हे कायदे तीव्र भेदभाव करणारे आणि धार्मिक स्वातंत्र्यावरील आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे आहेत, असे त्यांचे सांगणे आहे.
कोण आहेत अहमदिया मुस्लीम?
अहमदिया मुस्लीम समुदायाची स्थापना १८८९ मध्ये ब्रिटीश भारतातील पंजाब प्रांतातील कादियान शहरात झाली. या समुदायाची स्थापना मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती. त्यांनी स्वतःचा उल्लेख मसीहा आणि इस्लामचा सुधारक म्हणून केला होता. ते शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचा पुरस्कार करायचे. अल्लाहने धार्मिक युद्धे आणि कट्टरता संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मिर्झा गुलाम अहमद यांना पृथ्वीवर पाठवले, असे त्यांचे अनुयायी मानतात. अहमदिया समुदायातील लोकांना उदारमतवादी मानले जातात. मिर्झा गुलाम अहमद यांचा विश्वास होता की, झोरोस्टर, अब्राहम, मोशे, येशू, कृष्ण, बुद्ध, कन्फ्यूशियस, लाओ त्झू, गुरु नानक यांसारख्या इतर धर्मांच्या संतांच्या शिकवणी वाचल्याने एखादी व्यक्ती खरी मुस्लीम होऊ शकते.
परंतु, त्यांच्या याच भूमिकेमुळे ते पाकिस्तानमधील कट्टर धर्मगुरू आणि राजकारण्यांचे लक्ष ठरले. आज समाजात त्यांचे मोठे योगदान असूनही अहमदिया मुस्लीम पाकिस्तानमधील सर्वात जास्त छळ झालेल्या धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये येतात. त्यांना आगी मशिदींपासून तर कबरस्तानापर्यंत दुय्यम वागणूक दिली जाते. या समुदायाच्या मशिदींवर हल्ले झाले आहेत, त्यांच्या कबरी अपवित्र करण्यात आल्या आहेत आणि या समुदायातील सदस्यांना जमावाकडून होणारा हिंसाचार, द्वेषपूर्ण भाषण आणि संस्थात्मक भेदभावाला सामोरे जावे लागले आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) सारख्या संघटनादेखील त्यांच्यावर हल्ला करतात. मुख्य म्हणजे सौदी अरेबियादेखील अहमदिया मुस्लिमांना मुस्लीम मानत नाही. सौदी अरेबियाने २०१८ साली त्यांच्यावर हज करण्यास बंदी घातली होती. अहमदिया मुस्लीम हजला गेल्याचे आढळल्यास त्यांना ताब्यात घेतले जाते.