कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले हे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचे असल्याने दोन्ही मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाले पाहिजेत, असा दावा शनिवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही मतदारसंघ देण्यात यावेत अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली असताना काँग्रेसनेही हीच मागणी लावून धरल्याने महाविकास आघाडी अंतर्गत जागा वाटपाची चूरस वाढली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई येथील टिळक भवनात झालेल्या आढावा बैठकीवेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरातील नेत्यांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रा. जयंत आसगावकर, प्रदेश सचिव शशांक बावचकर आदींनी जिल्ह्याची भूमिका मांडली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसची दमदार कामगिरी सुरू आहे. त्यांनी जिल्हा भाजपा मुक्त केला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असल्याने मविआच्या जागा वाटपात दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवावेत, अशी जोरदार मागणी लावून धरण्यात आली.

हेही वाचा – कोल्हापूर: विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी

आधार कोणता ?

१९७१ सालापासून कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये दाजीबा देसाई यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष असले तरी नंतर काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले होते. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल असल्याने येथे पक्षाचेच उमेदवार द्यावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा – वस्त्रोद्योगाचे अनुदान आता मर्यादित कालावधीसाठी राज्यशासनाची नवी भूमिका सूचित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी, स्वाभिमानी मागे फरफट का?

‘राष्ट्रवादी’ने विधानसभेला आघाडी धर्म पाळला नाही. ‘स्वाभिमानी’ने आवाडेंचा प्रचार केला. त्यामुळे त्यांच्या मागे जाण्याची आमची अजिबात मानसिकता नाही. त्यांच्या सोयीसाठी आमचा बळी का देता? अशी परखड भूमिका प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी मांडली.