कोल्हापूर : वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मीळ ‘दख्खन केदारण्य’ साकारले जात आहे. आपले सर्व देव देवता निसर्गाशी साधर्म्य राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणारे आहेत. निसर्गाची सेवा केल्याशिवाय आपला नमस्कार कोणत्याच देवतांपर्यंत पोहोचत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा देवस्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन तर कार्यक्रमस्थळी खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार अशोक माने यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेन, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, प्रांताधिकारी समीर शिंगटे, ग्रामस्थ उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत आहे. विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत कार्बन न्यूट्रल देश करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरणविषयक महत्त्व पटवून दिले. ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. स्थानिक आमदार विनय कोरे म्हणाले, चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा या ठिकाणी उभे करू. मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांचे मत विचारात घेतले जाईल.