कोल्हापूर : काळम्मावाडी नळपाणी योजना राबवली म्हणून त्याचे श्रेय घेता तर मग नागरिकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी का झटकता, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर शनिवारी पलटवार केला.
काळम्मावाडी नळ पाणी योजना मार्गी लावण्यासाठी जरूर प्रयत्न केले. पण वितरण नलिकेतील दोष दूर करण्याचे काम कोल्हापूर महापालिकेचे आहे. हा मुद्दा सोडवण्याच्या बाबतीत महायुती शासन, स्थानिक नेते अपयशी ठरले आहेत, असा आरोप सतेज पाटील यांनी काल केला.
त्याला उत्तर देताना आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना उद्देशून प्रश्नाचा मारा केला.
दिवाळी अभ्यंगस्नानाचे स्वप्न दाखवून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. पालकमंत्री पद, महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसले नाही काय, कुचकामी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रतिसवाल क्षीरसागर यांनी केला.
विरोधकांना कामाचा पोटशूळ
जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आम्ही महायुतीचे सर्वच आमदार प्रशासनावर वचक ठेवून जनतेची कामे करून घेत असल्यानेच माजी पालकमंत्री यांना त्यांची अकार्यक्षमता जाणवत आहे. आमच्या कामामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, सन २०१२ मध्ये योजनेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. त्यावेळी आमदार सतेज पाटील पालकमंत्री होतेच यासह महानगरपालिकेत त्यांच्याच काँग्रेस पक्षाची सत्ता होती. ही योजना तब्बल १० वर्षांनी कार्यान्वित झाली.
दिवाळीचे अभ्यंगस्नान योजनेच्या पाण्याने करून श्रेय घेण्यात आमदार सतेज पाटील सर्वांत आघाडीवर होते. पण त्यानंतर पाईपलाइनला वारंवार लागणारी गळती, यंत्रणा बंद पडण्याच्या घटनांबाबत अबोला धरला होता. त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या योजनेत सुमारे ७० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. याबाबतही आमदार पाटील यांनी मौन बाळगले आहे. गळकी थेटपाईपलाइन योजना जनतेच्या माथी मारण्याचे काम करणारे आमदार सतेज पाटील योजनेचे अपयश लपविण्यासाठीच जनतेत दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत.
शहरातील वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. ही वितरण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी त्यांनी महापालिकेत सत्तेत असताना, पालकमंत्री पद असताना का घेतली नाही. स्वत: केलेले पाप महापालिका प्रशासनाच्या माथी मारण्याचे काम आमदार पाटील करत आहेत.
योजनेचा आराखडा सन २०४५ ची लोकसंख्या गृहीत धरून करण्यात आले. काम करणारी ठेकेदार कंपनी, सल्लागार कंपनी आमदार सतेज पाटील सत्तेत असतानाच नेमण्यात आली होती. काम योग्य पद्धतीने होते की नाही हे तपासण्याची पण त्यांची तितकीच जबाबदारी होती. पण हीच जबाबदारी पार पाडता न आल्याने आमदार पाटील जनतेची दिशाभूल करत आहेत.
महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात होणारे विकासाचे काम जनता पाहत आहे. पण स्वत:चा अकार्यक्षमपणा लपविण्यासाठी महायुतीच्या विकासाच्या कामांना विरोध करणे, टीका करणे हेच काम आमदार सतेज पाटील यांच्याकडे शिल्लक राहिले आहे. महायुती कोल्हापूरच्या विकासासाठी सक्षमपणे काम करत असून, त्यांचेच फलित म्हणून विधानसभा निवडणूक लोकांच्या विश्वासावर एकतर्फी जिंकण्यात महायुती पात्र ठरली आहे. त्यामुळे आगामी काळातही कोल्हापूरकर विकासाच्या उद्देशाने मार्गक्रमण करणाऱ्या महायुतीच्या पाठीशी ठाम राहतील.