कोल्हापूर : इचलकरंजी शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कॉ. के. एल. मलाबादे चौक येथे उभारण्याच्या मुद्द्यावरून रविवारी आमदार प्रकाश आवाडे आणि ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.

स्वच्छ भारत अभियान उपक्रमाअंतर्गत इचलकरंजीत प्रत्यक्ष श्रमदानाद्वारे कॉ. मलाबादे चौकात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि माजी लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. इचलकरंजीत संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आमदार आवाडे यांनी कॉ. मलाबादे चौकात पुतळा बसविण्यासाठीचा प्रस्ताव इचलकरंजी नगरपरिषदेने द्यावा असे सांगितले होते. तोच धागा पकडत आमदार आवाडे यांनी आज स्वच्छता कार्यक्रमात विषय उपस्थित केला.
ते म्हणाले, शासन दरबारी पाठपुरावा करत पुतळा उभारणीस मी मंजुरी आणली आहे. आता महानगरपालिकेने प्रस्ताव द्यावा. शासन निधीतून कॉ. मलाबादे चौकात पुतळा उभारला जाईल, कोणाला विरोध करायचा त्यांनी करावा.

हेही वाचा – जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचण्याची घटना, मंत्री गिरीश महाजन म्हणाले…

हेही वाचा – उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारल्याने सोलापूरकर सुखावले 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी नगरसेवक सागर चाळके, सदा मलाबादे यांनी आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज चौकात पुतळा उभारण्याचे ठरले असताना कॉ. मलाबादे चौकाचा अट्टाहास का, आजच्या कार्यक्रमात हा विषय काढण्याची गरज काय होती, असा सवाल केला. त्यावरून आमदार आवाडे व चाळके यांच्यात शाब्दिक वाद झाला. आवाडे आपल्या मतावर ठाम राहिल्याने वाद वाढत असल्याचे पाहून खासदार धैर्यशील माने व अन्य लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत वाद संपुष्टात आणला.