इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. यावेळी त्याने खेळाडूंविषयी नव्हे तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केले. हा मालिकाविजय भारतीय खेळाडू किंवा चाहत्यांसाठी खूप खास होता.

फॉक्स क्रिकेटवर वक्तव्य करताना वॉन म्हणाला, “जेव्हा भारताने पुनरागमन केले आणि अजिंक्य रहाणेने कर्णधारपद सांभाळले तेव्हा ते आश्चर्यकारक होते. त्यानंतर ते सिडनीला पोहोचले. या कसोटीच्या शेवटच्या दिवशी दोन्ही संघांनी जबरदस्त खेळी केल्यामुळे सामना अनिर्णित राहिला.”

वॉन म्हणाला, “ऋषभ पंतने भारतासाठी सर्वोत्कृष्ट खेळ दर्शविला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. मालिकेच्या अंतिम सामन्यात तो चमकदार खेळला. पूर्ण दौऱ्यात तो फॉर्मात होता, मात्र, शेवटच्या दोन सामन्यांमुळे तो चर्चेत आला. या विजयामुळे रवी शास्त्रींनी किती रेड वाइन घेतली असेल, याची मी कल्पना करू शकतो.”

पिछाडीनंतर मालिकेत बाजी

बॉर्डर-गावसकर मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.