भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका सुरु झाली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या मालिकेत भारताच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सांभाळत आहे, तर पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच मालिका आहे. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी खराब राहिली. आता प्रशिक्षक द्रविड आणि संघाच्या नजरा २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या पुढील विश्वचषकावर आहेत. रोहित शर्मानेही मोजक्या शब्दात याकडे लक्ष वेधले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली. त्यानंतर तो म्हणाला, ”आम्ही आधी गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसत आहे, लक्ष्याचा पाठलाग करावा असे वाटले. काही दिवस सराव करताना खूप दव पडले होते. हे चांगले आहे. दुबईहून परतलो, काही दिवस घरी घालवले आणि मग बाहेर खेळायला गेलो पण ते संघासाठी चांगले होईल.”

हेही वाचा – IND vs NZ : भारताला मिळाला अजून एक ‘अय्यर’..! पदार्पणाच्या टी-२० सामन्यापूर्वी म्हणतो, ‘‘राहुल सरांच्या…”

तो पुढे म्हणाला, ‘पुढील विश्वचषकावर आमची नजर आहे, अजून वेळ असला तरी आम्ही आमच्या पर्यायांवर काम करण्याचा प्रयत्न करू. काही निकाल लगेच मिळू शकत नाहीत, पण प्रक्रिया महत्त्वाची असेल.”

भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज.