India vs West Indies 3rd T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गयानातल्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामन्याला सुरुवात होताच एक अजब गोष्ट घडल्याचं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात गेलेले भारतीय खेळाडू खेळपट्टीवर जाऊन माघारी परतल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. मैदानात नेमकं काय घडलं? असा प्रश्न सर्वांना पडला होता. खरंतर गयाना स्टेडियमवरील पिच क्युरेटर आणि ग्राऊंड स्टाफ मैदानात ३० यार्ड सर्कल बनवायचं विसरले होते. खेळपट्टीवर ३० यार्ड सर्कल नसल्यामुळे भारतीय संघ पव्हेलियनमध्ये परतला होता. क्रिकेट इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली होती. वेगवेगळ्या कारणांनी सुरू असलेला सामना थांबल्याचं क्रिकेटरसिकांनी अनेकदा पाहिलं आहे. परंतु ३० यार्ड सर्कल नसल्यामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. ३० यार्ड सर्कल नसल्यामुळे भारतीय संघ माघारी परतत असताना खेळपट्टीवर उभे असलेले वेस्ट इंडिजचे सलामीवीरही पव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर काही मिनिटात ग्राऊंड स्टाफने ३० यार्ड सर्कल आखल्यानंतर सामन्याला सुरुवात करण्यात आली. परंतु, सोशल मीडियावर आता या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही गंमतीदार तर काही गंभीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. भारतीय संघ या सामन्यात दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. रवी बिश्नोईच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तर इशान किशनच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली आहे. या सामन्याद्वारे जयस्वालने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. हे ही वाचा >> ODI WC 2023: “या संघात त्याला जागा मिळणे…”, स्वत: चे स्थान डळमळीत असणाऱ्या ‘या’ खेळाडूचे संजू सॅमसनविषयी आश्चर्यकारक विधान गयानामधील या सामन्यात टीम इंडिया सामन्यात पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल. कारण पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने वेस्ट इंडिजने आणि एक सामना भारताने जिंकला आहे. आजचा सामना भारताने गमावला तर भारताला ही मालिकाही गमवावी लागेल.