Rahul Dravid on Team India: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नाही. टी२० मालिकेतील ५व्या सामन्यात संघाला ८ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि टीम इंडियाने मालिका ३-२ने गमावली. या दौऱ्यातील टीम इंडियाच्या कामगिरीबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रामाणिकपण झालेल्या चुका कबूल केल्या आहेत. ते म्हणाले की, “काही वेळा एकाच वेळी सर्व फॉरमॅटमध्ये लागोपाठ खेळणे आणि त्यात चमकदार कामगिरी करणे कठीण जाते. मात्र, यात आम्ही नक्कीच सुधारणा करू.”

टी२० मालिकेतील पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, “आम्ही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली. टी२० मध्येही आम्ही दोन सामने गमावल्यानंतर चांगले पुनरागमन करू शकलो, परंतु आम्हाला अपेक्षेप्रमाणे मालिकेचा शेवट करता आला नाही. पहिल्या दोन सामन्यात आणि ५व्या सामन्यात आम्ही काही चुका केल्या, त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यांमध्ये आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करू शकलो नाही, परंतु हा युवा संघ आहे ज्यात सातत्याने सुधारणा होत आहे. हा अनुभव या खेळाडूंसाठी खूप काही देऊन जाईल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.”

हेही वाचा: IND vs WI: हार्दिक पांड्याच्या चॅलेंजवर निकोलस पूरनने केली बोलती बंद, नेमकं काय झालं? पाहा Video

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, “आम्हाला या मालिकेत युवा खेळाडूंना संधी द्यायची होती. आम्ही काही कॉम्बिनेशन देखील वापरून पाहिले आणि आमच्यासाठी काही सकारात्मक त्यात घडल्या, हे कोणीच नाकारू शकत नाही. जसेजसे अधिक या खेळाडूंना संधी मिळेल तसेतसे ते अधिक प्रगल्भ होत जातील.”

आम्हाला टी२० मध्ये फलंदाजीतील डेप्थ आणखी सुधारायची आहे

वेस्ट इंडिजचा संघ अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला असून अल्झारी जोसेफ ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. द्रविड पुढे म्हणाला, “या फॉरमॅटमध्ये स्कोअर दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्ही वेस्ट इंडिजकडे बघितले तर अल्झारी जोसेफ ११व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो आणि तो मोठे फटके मारतो. म्हणूनच असे अनेक संघ आहेत ज्यांच्या फलंदाजीत डेप्थ आहे. निश्चितच या बाबतीत आपल्यासमोर काही आव्हाने आहेत आणि आपण त्यावर काम करणे आवश्यक आहे. आम्हाला टी२० मध्ये फलंदाजीतील डेप्थ आणखी सुधारायची आहे. या मालिकेने आम्हाला निश्चितपणे दाखवून दिले की, आम्हाला आमची तळाच्या फळीतील फलंदाजी मजबूत करायची आहे.”

हेही वाचा: Prithvi Shaw: आधी द्विशतक अन् आता पुन्हा एक शतक; वर्ल्डकपच्या संघात ‘पृथ्वी शॉ’ने ठोकली दावेदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवा खेळाडूंनी प्रशिक्षकाला प्रभावित केले

तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांनी या टी२० मालिकेतून पदार्पण केले आणि या तिघांच्याही कामगिरीने द्रविड प्रभावित झाला आहे. द्रविड म्हणाला, “मला विश्वास आहे की पदार्पण केलेल्या तिन्ही खेळाडूंनी आपली जबाबदारी चोख बजावली. चौथ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार खेळी केली. त्याने आयपीएलमध्ये जे केले, त्याचीच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरावृत्ती करत आहे, हे त्याने दाखवून दिले. तिलक वर्माने मधल्या फळीत खरोखरच चांगली कामगिरी केली. त्याने काही प्रसंगी कठीण परिस्थितीत फलंदाजी केली. या दौऱ्यात मुकेशने सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आणि मला वाटते की त्याने खूप चांगले जुळवून घेतले.”