भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाकिस्तानने भारतापुढे धावांचा मोठा डोंगर उभा करूनही भारतीय महिला क्रिकेट संघाने विजयी पताका फडकवला आहे. भारतीय संघाच्या या आगळ्यावेगळ्या विजयाचे क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अभिनंदन केले आहे. त्याने भारतीय महिला संघाचे अभिनंदन करण्यासाठी एक खास ट्वीट केले आहे.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
सचिन तेंडुलकरने भारतीय महिला क्रिकेट टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे. “मी हा सामाना पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत पाहिला. हा सामना मला खूप आवडला. शफालीने चांगल्या प्रकारे सुरुवात केली होती. त्यानंतर जेमिमाहेही चांगल्या प्रकारे खेळ दाखवला. तिला रिछाचीही उत्तम साथ लाभली. भारताला पुन्हा एकदा जिंकताना पाहून आनंद झाला,” असे म्हणत सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे अभिनंदन केले.
पाकिस्तानने समोर ठेवले होते १५० धावांचे आव्हान
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
थरारक सामन्यात जेमिमाहच्या नाबाद ५५ धावा
भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. मात्र, रिचा आणि जेमिमाह यांच्या मनात काही वेगळेच होते. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहच्या टी२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते. जेमिमाहने ५५ चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली.