IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. या सामन्यातील नो बॉल प्रकरण सध्या चर्चेत आहेत. मात्र या बरोबरच या सामन्यात आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले. ते म्हणजे युवराजने फटकावलेले तीन सलग षटकार… बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर क्रिकेटप्रेमींना जुन्या युवराज सिंगचं दर्शन घडलं. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या युवराजने छोटेखानी खेळीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मुंबईने १८७ धावांपर्यंत मजल मारली. या वेळी युवराजने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार खेचत सर्वांची वाहवा मिळवली.

याबाबत सामन्यानंतर बोलताना युझवेंद्र चहल म्हणाला की ज्या वेळी माझ्या गोलंदाजीवर युवराजने सलग ३ षटकार खेचले, तेव्हा मला स्टुअर्ट ब्रॉड आठवला होता. युवराजने ब्रॉडला २००७ साली टी २० विश्वचषकात ६ चेंडूवर ६ षटकार खेचले होते. तो क्षण अजूनही साऱ्यांच्या स्मरणात आहे. ‘युवराज हा दिग्गज खेळाडू आहे. तो अनुभवानेही थोर आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीची गोलंदाजी करत राहिलो आणि तो षटकार खेचत राहिला. पण तीन षटकार खेचल्यानंतर मात्र मी थोडेसे धाडस करून बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर तो बाद झाला’, असेही त्याने स्पष्ट केले.

 

युवराजचा आक्रमक अवतार पाहून तो परत ६ चेंडूत ६ षटकार खेचणार असे वाटत होते. पण चहलला सलग चौथा षटकार खेचण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याच्या या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर ६ धावांनी मात केली. बाराव्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने १९ व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या १८ धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही. बुमराहने आजच्या सामन्यात ३ बळी घेतले. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती. मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एबी डिव्हीलियर्सने ७० धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली.

त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं.पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी फटकेबाजी करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यामुळे मुंबईने आश्वासक धावसंख्या गाठली. मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.