आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना चांगलाच रोमहर्षक झाला. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या या लढतीत राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला २३ धावांनी पराभूत केलं. मुंबईच्या विजयासाठी इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र त्यांची ही मेहनत व्यर्थ ठरली. आजचा सामना अनेक अर्थांनी विशेष ठरला. तिलक वर्माची फलंदाजी तर विशेष अभिनंदनीय ठरली. मात्र तिलक फलंदाजी करताना त्याने जोराचा फटका मारल्यामुळे चेंडू लागून एक कॅमेरामॅन जखमी झाला आहे.
सामना सुरु असताना नेमकं काय घडलं ?
मुंबई आणि राजस्थान यांच्यात सामना सुरु असताना इशान किशन आणि तिलक वर्मा ही जोडी फलंदाजी करत होती. मुंबईला ५० चेंडूंमध्ये ८८ धावा करायच्या होत्या. त्यामुळे मोठे फटके मारणे गरजेचे होते. तिलक वर्मा तर पूर्ण फॉर्ममध्ये होता. त्याने जोराचा फटका मारल्यानंतर चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. मुंबई इंडियन्सला एकाच चेंडूमध्ये सहा धावा मिळाल्या. मात्र हा चेंडू थेट कॅमेरामॅनला जाऊन लागला. चेंडू थेट डोक्यावर लागल्यामुळे हा कॅमेरामॅन जखमी झाला. त्यानंतर राजस्थानच्या क्षेत्ररक्षकाने कॅमेरामॅनला मदत पुरण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आजच्या या समन्यात मुंबईच्या तिलक वर्मा आणि इशान किशन यांनी चांगली कामगिरी केली. इशान किशनने ४३ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३३ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. मात्र षटके संपल्यामुळे मुंबई इंडियन्सचा २३ धावांनी पराभव झाला.