दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मंगळवारी (११ एप्रिल) आयपीएलच्या १६व्या हंगामातील १६वा सामना खेळवला जाणार आहे. हे असे दोन संघ आहेत ज्यांना या हंगामात अद्याप विजय मिळवता आलेला नाही. अरुण जेटली स्टेडियमवर जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने असतील तेव्हा त्यांना आपले खाते उघडायचे आहे. दोन सामन्यांत दोन पराभवांसह मुंबई नवव्या स्थानावर आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ तीन सामन्यांत तीन पराभवांसह शेवटच्या १०व्या स्थानावर आहे. त्यात माजी दिग्गज लिटल मास्टर सुनील गावसकरांनी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना चांगलेच सुनावले आहे.
भागीदारी न केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा झाला पराभव- गावसकर
“सध्याच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विशेषत: रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीमध्ये चांगली भागीदारी न झाल्यामुळे पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला,” असे महान फलंदाज सुनील गावसकर यांचे मत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित आणि इशान चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले.
गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “गेल्या हंगामापासून मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे चांगली भागीदारी न करणे. मोठी भागीदारी केल्याशिवाय मोठी धावसंख्या उभारणे कठीण आहे. ते पुढे म्हणाले, “मुंबई इंडियन्स या बाबतीत सतत झगडत आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्या छोट्या पण उपयुक्त भागीदारीवर मुंबईने आपला डाव उभा केला पाहिजे. इशान किशनला भागीदारी कशी करायची आता याचे धडे द्यावे लागतील का? आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहोत त्यामुळे एकेरी-दुहेरी धाव कशी काढायची आणि त्यातून कशी भागीदारी रचायची याचे स्कील त्याच्यात कमी आहेत असे मला वाटते. लवकरच सुधारणा न झाल्यास मागील हंगामातील परिस्थिती मुंबईवर येऊ शकते.” असे म्हणत त्यांनी एकप्रकारे रोहितला इशारा दिला आहे.
आर्चरचे मुंबईत पुनरागमन शक्य
मुंबई आयपीएलमध्ये संथ सुरुवातीसाठी ओळखली जाते. त्यांच्याकडे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, इशान किशन असे खेळाडू आहेत, हे चौघेही आतापर्यंत गेल्या दोन सामन्यांमध्ये छाप पाडू शकलेले नाहीत. गेल्या सामन्यात रोहितला तुषार देशपांडने एका चांगल्या चेंडूवर बाद केले. मुंबईला येथे चांगली कामगिरी करायची असेल तर रोहितला आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर इशानच्या बॅटनेही अजून मोठी इनिंग बाहेर आलेली नाही.
अत्यंत महागड्या कॅमेरून ग्रीनने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत आपल्या कामगिरीची झलकही दाखवलेली नाही. सूर्यकुमार फॉर्ममध्ये नसणे ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे. वरचा क्रम चालला नाही तर मुंबईला सूर्याचा आधार आहे, जो सध्या मिळत नाही. जोफ्रा आर्चर या सामन्यात असू शकतो. कॅमेरून ग्रीनने सामन्याच्या एक दिवस आधी सांगितले की, संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. त्यामुळे या सामन्यात आर्चरचा प्रवेश होईल, असे मुंबईच्या चाहत्यांना वाटत आहे.