Jasprit Bumrah vs Rahul Tewatia Viral Video: आयपीएल २०२५ स्पर्धेत आतापर्यंत अनेक वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी करत गुजरातवर २० धावांनी विजय मिळवला. यासह आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईच्या या विजयात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोलाचं योगदान दिलं. ज्यावेळी मुंबईला विकेटची खूप जास्त गरज होती. त्यावेळी बुमराहने गोलंदाजीला येऊन विकेट काढून दिली. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात जसप्रीत बुमराह आणि राहुल तेवतिया या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. या सामन्यातील १८ वे षटक जसप्रीत बुमराहने टाकले. हे षटक अतिशय निर्णायक ठरले. बुमराह गोलंदाजी करत असताना राहुल तेवतिया स्ट्राईकवर होता. त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर डीप मिड विकेटच्या वरून शानदार षटकार मारला. पुढचा चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर पुढील चेंडू तेवतीयाच्या पॅडला जाऊन लागला. चेंडू लागताच तो एक धाव घेण्यासाठी धावला. यादरम्यान तो काहीतरी बोलताना दिसून आला. यावर बुमराहने देखील आपली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला बुमराह?
धाव घेत असताना तेवतिया जे काही म्हणाला, त्यावर जसप्रीत बुमराहने प्रत्युत्तर देत म्हटले, ” मला काही बोलू नको.” यावर तेवतिया म्हणाला, ” मी तुला काहीच बोललो नाही, मी स्वतःसाठी हे शब्द वापरले आहेत.” दोघांमधील हा वाद पेटण्यापूर्वीच शांत झाला. बुमराह आपल्या रनअपवर गेला आणि पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईने मारली बाजी
हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण जो संघ पराभूत होणार तो स्पर्धेतून बाहेर पडणार होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ४७ धावांची खेळी केली.
या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद २२८ धावांचा डोंगर उभा केला. गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शनने ८० धावांची तुफानी खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा केल्या. मात्र, गुजरातचा संघ विजयापासून २० धावा दूर राहिला.