PBKS vs MI Highlights: मुंबईकर श्रेयस अय्यर पंजाबकडून खेळताना मुंबई इंडियन्सवर भारी पडला आहे. पंजाब किंग्जने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला आहे. आधी दिल्ली कॅपिटल्स, नंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि आता पंजाब किंग्जला त्याने आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२० स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं आणि ट्रॉफी देखील जिंकून दिली. आता पंजाबचा संघ आपल्या पहिल्या जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. पंजाबचा अंतिम सामना ३ जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे.
पंजाबचा दमदार विजय
पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०४ धावा करायच्या होत्या. या हाय प्रेशर सामन्यात २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नव्हतं. त्यामुळे दबाव पूर्णपणे पंजाब किंग्ज संघावर होता. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगची जोडी मैदानावर आली. या महत्वाच्या सामन्यात या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची गरज होती. मात्र प्रभसिमरन सिंग अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. तर प्रियांश आर्य अवघ्या २० धावांवर माघारी परतला. सलामी जोडी फ्लॉप ठरल्यानंतर जोस इंग्लिशही ३८ धावा करत माघारी परतला.
श्रेयस अय्यरचा वन मॅन शो
पंजाब किंग्ज संघाला एका पाठोपाठएक मोठे धक्के बसत होते. पण संघातील सर्वात विश्वासू आणि जबाबदार खेळाडू शेवटपर्यंत उभा होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आज संघाला सर्वात जास्त गरज असताना, श्रेयस अय्यर शेवटपर्यंत उभा राहिला. श्रेयसने ४१ चेंडूंचा सामना करत नाबाद ४७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ८ षटकार मारले.
मुंबईने उभारला २०३ धावांचा डोंगर
पावसामुळे व्यत्यय आल्याने या सामन्याला उशिराने सुरूवात झाली. ९ वाजून ४५ मिनिटांनी या सामन्याला सुरूवात झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टोची जोडी मैदानावर आली. या जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. या जोडीला अवघ्या १९ धावांची भागीदारी करता आली. रोहित शर्मा अवघ्या अवघ्या ८ धावा करता आल्या.
तर जॉनी बेअरस्टोने ३८ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने ४४ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने देखील ४४ धावांची खेळी केली. सलामीची जोडी फ्लॉप ठरल्यानंतर, मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सांभाळला. शेवटी हार्दिक पांड्याने १५ आणि नमन धीरने ३७ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०३ धावांपर्यंत पोहोचवली.