Virat Kohli Welcome In Bengaluru: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. गेल्या १८ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आपल्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होता. अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा कारनामा करून दाखवला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची बंगळुरूत दमदार एन्ट्री
या स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. मात्र, तरीदेखील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. आरसीबीने जेतेपदाची ट्रॉफी उंचावताच, क्रिकेट चाहत्यांनी तुफान जल्लोष केला. बंगळुरूत दिवाळी असल्यासारखं भासत होतं. कारण आरसीबीचे फॅन्स या क्षणाची गेल्या १८ वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ट्रॉफी बंगळुरूत आली आहे. विराट कोहली आणि संपूर्ण आरसीबीचा संघ बंगळुरूत दाखल झाला आहे. दरम्यान कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री विमानतळावर विराट कोहलीच्या स्वागतासाठी सज्ज होते.
आयपीएल ट्रॉफी जिंकणं हा आरसीबी संघासाठी खूप मोठा क्षण आहे. कारण एकटा विराट कोहली नव्हे, तर या संघाला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक चाहत्याने हे स्वप्न पाहिलं होतं. आरसीबीच्या विजयाचा बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोष होणार आहे. आरसीबीचे खेळाडू गुजरातहून बंगळुरूत दाखल झाले आहेत. कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवाकुमार हे विमानतळावर विराट कोहलीची वाट पाहण्यासाठी सज्ज होते. उपमुख्यमंत्र्यांनी विराटचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यासह आरसीबीचा झेंडाही फडकवला. त्यावेळी विराटच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
आरसीबीचा दमदार विजय
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने २६ आणि लियाम लिव्हंगस्टनने २५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांअखेर ९ गडी बाद १९० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने नाबाद ६१ धावांची खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाबचा संघ विजयापासून ६ धावा दूर राहिला.