RCB Victory Parade Bengaluru Stampede : कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेडच्या वेळी चेंगराचेंगरी दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह आदी नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान, यानंतर आता बंगळुरुतील चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत आरसीबीकडून अधिकृत निवेदन जारी करत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झालं असून आमच्यासाठी सर्वांची सुरक्षितता महत्वाची असल्याचं आरसीबीने निवेदनात म्हटलं आहे. तसेच चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यानंतर आम्ही तातडीने कार्यक्रमात बदल केल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबीचे निवेदनात काय म्हटलं?
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबीकडून एक निवेदन सादर करण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलं की, “आज दुपारी संघाच्या आगमनानंतर बेंगळुरूमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमावेळी झालेल्या दुर्दैवी घटनांची माहिती माध्यमांच्या वृत्तांतातून समोर आल्यानंतर आम्हाला खूप दुःख झालं आहे. सर्वांची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबी शोक व्यक्त करत आहे. तसेच पीडित कुटुंबांना आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमात तातडीने बदल केले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करत आहोत. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना कृपया सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो”, असं आरसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Royal Challengers Bengaluru releases a statement on the Bengaluru stampede.
— ANI (@ANI) June 4, 2025
"We are deeply anguished by the unfortunate incidents that have come to light through media reports regarding public gatherings all over Bengaluru in anticipation of the team’s arrival this afternoon.… pic.twitter.com/kWvTjwF5Tm
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?
“चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. साधारण तीन लाख लोक या ठिकाणी जमा झाले होते. मैदानाची क्षमता ३५ हजार इतकीच आहे. आम्हाला वाटलं होतं की साधारण या संख्येहून काही जास्त लोक येतील. ज्या ११ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यापैकी बरेच तरुण-तरुणी आहेत”, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं.
मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांच्या मदतीची घोषणा
चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही १० लाखांची मदत जाहीर करत आहोत, अशीही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. तसंच घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच चेंगराचेंगरीची घटना कशी घडली? याची उच्चस्तरीय चौकशीचे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी यांनी दिली आहे.
Karnataka CM Siddaramaiah tweets, "Visited Bowring and Vaidehi hospitals, inquired about the well-being of those injured in the stampede near Chinnaswamy Stadium, and offered condolences to the families of the deceased" pic.twitter.com/NpRJr1RKf2
— ANI (@ANI) June 4, 2025
घटना कशी घडली?
आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. मात्र, यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याबरोबर माझे विचार आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.