नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवण्याचा सल्ला भारताला दिला आहे. यासह भारत आणि वेस्ट इंडिज या संघांदरम्यान अंतिम लढत होईल असे भाकीतही लाराने केले आहे.

या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे मुंबईकर फलंदाज भारताच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित असून विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर खेळू शकेल. मात्र, भारताला यशस्वी ठरायचे असल्यास ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अव्वल फलंदाज सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर खेळले पाहिजे, असे लाराला वाटते.

‘‘भारताने सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सूर्यकुमार हा एक अलौकिक खेळाडू आहे. तुम्ही अगदी व्हीव्ह रिचर्ड्स यांना विचारले तरी ते देखील असेच सांगतील. अर्थात, माझा हा सल्ला प्रत्येकाला आवडेलच असे नाही. मात्र, सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे असे मला मनापासून वाटते,’’ असे लारा म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर

‘‘सूर्यकुमार १० ते १५ षटके जरी खेळला, तरी सामन्याचे चित्र बदलू शकते. त्याला सलामीला खेळवले तर खूपच चांगले. मात्र, या सगळ्याचा विचार करताना संघ व्यवस्थापनाने एक परिपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे. रोहित आणि विराट यांनी सलामी केली, तर सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे सोपे जाईल,’’ असेही लाराने सांगितले.

यजमान वेस्ट इंडिज संघाबाबत लारा म्हणाला, ‘‘विंडीज संघातही वैयक्तिक गुणवत्ता आणि कौशल्य असलेले खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू एक संघ म्हणून जर खेळले, तर त्यांना रोखणे कठीण जाईल.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००७ ची पुनरावृत्ती नको…

विंडीजमध्ये २००७ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. त्याचा फटका संपूर्ण स्पर्धेला बसला होता. या वेळी भारतीय संघाने चांगली कामगिरी करावी अशी माझ्यासह विडींजमधील सर्वच क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. भारत आणि विंडीज या संघांत अंतिम लढत झाली तर मला फार आनंद होईल, असेही लाराने सांगितले.