डॉ. सोनल आयकर,

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

हल्लीचा जमाना हा इन्स्टंट गोष्टींचा आहे. इन्स्टंट नूडल्सच नाही तर बऱ्याच इतर झटपट गोष्टी आता बाजारात दिसू लागल्या आहेत. मग चहा आणि कॉफी तरी कसे मागे राहतील! मुळात फिल्टर कॉफी किंवा चहा बनविण्यासाठी त्याची पूड आपण उकळत्या पाण्यात टाकून गरम करून नंतर गाळून घेतो. ही पूड जेव्हा पाण्यात उकळत असते तेव्हा त्यातील टॅनिन आणि कॅफिनसारखे घटक पाण्यात येतात. आणि ह्या घटकांच्या सेवनानेच आपल्याला ताजेतवाने वाटते. तसेच हेच घटक पेयाला विशिष्ट चवही देतात. आता हे घटक विरघळून चहा / कॉफीच्या पुडीतून पाण्यात आल्यावर आपण गाळून घेतो आणि न विरघळलेली भुकटी वेगळी करतो. हे घटक पाण्यात विरघळण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो आणि ते आपल्याला पाण्याच्या गडद होणाऱ्या रंगावरून दिसून येते. मात्र आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणाला बरे एवढा वेळ? इन्स्टंट चहा / कॉफीची बारीक पूड गरम पाण्यात टाकली की पूर्णत: विरघळते आणि मिनिटभरात चहा / कॉफी तयार होते. उकळायची वा गाळून घ्यायची गरजच नाही. जर हा चहापत्तीचाच चहा आहे आणि कॉफीच्या बियांचीच कॉफी आहे तर असे कसे बरे!

ही कमाल आहे त्याच्या बनविण्याच्या पद्धतीत. वास्तविक इन्स्टंट कॉफीसाठी अगोदर कॉफी कमी पाण्यात उकळून आणि नंतर गाळून त्याचा अर्क काढून घेतात. हा अर्क म्हणजे आटीव कॉफीच. मग त्यातील पाण्याचे बाष्प काढून घेऊन उरलेल्या गाळाची भुकटी बनवतात. ही भुकटी म्हणजे इन्स्टंट कॉफी. त्यामुळेच ही फक्त गरम पाण्यात टाकली की साखरेसारखी विरघळून कॉफी बनविते.

जसे इन्स्टंट कॉफीचे तसेच इन्स्टंट चहाचे. ह्याच्या चवीत वा गुणधर्मात फिल्टर चहा वा कॉफीपेक्षा काही कमतरता जाणवत नाही. इन्स्टंट नूडल्ससुद्धा काहीशा या सारख्याच पद्धतीने बनवितात. अगोदर नूडल्स पिठापासून बनवतात आणि नंतर उकडून ते शिजवतात. जास्त काळ ते टिकावेत म्हणून तळून किंवा ओवनमध्ये वाळवून त्यातील पाणी काढून घेतात. असे नूडल्स अगोदरच शिजविले असल्याने नंतर फक्त उकळत्या पाण्यात टाकताच काही मिनिटांतच ते फुलतात / भिजतात आणि मसाले टाकून खाण्यालायक होतात. अशा इन्स्टंट नूडल्स, सूपमध्ये भाज्या असतात. या भाज्या अगोदर बारीक तुकडे करून कधी भाजून वा वाळवून पाणीमुक्त (ीिँ८१िं३ी) करून घेतात. भाज्या ओल्या असल्या की सडतात आणि खराब होतात. परंतु पाणी काढून टाकल्यावर त्या जास्त काळ टिकतात. तसेच त्यांचे बारीक तुकडे पदार्थ बनवताना लगेच शिजतात. वरील सर्व उदाहरणांत खाद्य अगोदरच विरघळवून वा शिजवून घेतले असल्यामुळे बनविण्यासाठी लागणारा आपला वेळ वाचतो. तसेच ह्यांत पाण्याचा अंश कमी असल्याने ते जास्त काळ टिकतात आणि झटपट तयार होतात.