– डॉ. रॉय पाटणकर

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपला बराचसा वेळ हा कामानिमित्त घराबाहेरच जात असतो. त्यामुळे सहाजिकच बाहेरील उघड्यावरील तेळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणं होतं. परंतु या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेक जणांना अॅसिडीटीचा त्रास जाणवू लागतो. पोटात जळजळणं, छातीत जळजळ असे त्रास होऊ लागतात. त्यामुळे अशा रुग्णांना डॉक्टर बऱ्याच वेळा ‘प्रोटॉन पंप इनहिबिटरस’ (पी.पी.आय.) औषध देतात. परंतु, ‘अ‍ॅसिडिटी’ टाळण्यासाठी अनेक जण या औषधांचा अतिवापर करतात.मात्र हा अतिवापर करणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मूत्रपिंडाचं आरोग्य जपायचं असेल तर कोणत्याही औषधांचा अतिरेक करणं योग्य नाही.

‘अ‍ॅसिडिटी’ म्हणजे नेमके काय?

आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. जो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात हाच पाचक रस जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो, यालाच ‘अ‍ॅसिडिटी’ असे म्हणतात. हा आजार छातीत जळजळ होणे, अपचन किंवा पायरोसिस म्हणूनही ओळखल जाते. या आजारात छातीत, पोटात आणि घशात जळजळ होणे, तोंडात आंबट चव येणे, उलट्या होणे, मळमळ होणे, उचकी लागणे , पोटातील वरच्या भागात अस्वस्थता आणि जेवणानंतरचे जडपणा,अशक्तपणा ही लक्षणे जाणवतात.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, अतिप्रमाणात जेवल्यामुळे, अतिप्रमाणात मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने, ताणतणाव, जास्त मद्यपान करणे, धुम्रपान करणे यामुळेही ‘अ‍ॅसिडिटी’ ची समस्या जाणवते. अशावेळी, डॉक्टर रूग्णाला अँटासिड औषध लिहून देतात. ज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि अॅल्युमिनियम किंवा ‘प्रोटॉन पंप इनहिबिटर’ (पी.पी.आय) असतात. जे आम्ल तयार करतात. परंतु, या औषधांचा अतिवापर करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

‘अ‍ॅसिडिटी’ वर अतिप्रमाणात औषध घेणं आरोग्यास हानिकारक का आहे ?

१. छातीत जळजळ होत असल्यास औषधांचा ओव्हरडोस घेऊ नये, कारण या औषधांचा दीर्घकालीन वापर केल्यास मूत्रपिंडाच्या तीव्र आजार होऊ शकतो. यात मूत्रपिंड रक्त प्रभावीपणे फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते.

२. पी.पी.आय औषधांचे नियमितपणे एका वर्ष घेतल्यास ऑस्टिओपोरोसिस देखील होऊ शकतो (हाडांची घनता कमी झाल्यास हे होते. याचा परिणाम हाडांच्या रचना आणि सामर्थ्यावर होतो आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते). शिवाय, यामुळे वयोवृद्ध लोकांमध्ये हिप फ्रॅक्चर होऊ शकते. कारण हे पोटात कॅल्शियम आणि लोह शोषण्यास प्रतिबंध करते. अशा प्रकारे या रुग्णांमध्ये कॅल्शियम आणि लोहाची कमतरता जास्त असते.

३. जास्त काळ पी.पी.आय घेतल्यास मॅग्नेशियमची कमतरता जाणवते. म्हणूनच, ज्या रुग्णांना हृदयाचा गंभीर आजार आहे. असा रूग्ण आयसीयूमध्ये दाखल झाला असले तर अ‍ॅसिडिटीविरोधी औषधांमुळे मॅग्नेशियम पातळीत घट होऊ शकते. यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकतात. म्हणूनच अ‍ॅसिडिटीवरील औषधांचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षात अनेक लोक या औषधांचा गैरवापर करत असल्याचं समोर येत आहे. काही औषध रक्त पातळ होऊ देत नाही. यामुळे हृदयविकार बळावू शकतो.

पी.पी.आयव्यतिरिक्त इतर पर्याय

१.  डॉक्टर तुम्हाला एंडोस्कोपी, अँटी-रिफ्लक्स सर्जरी करण्याचा सल्ला देखील देऊ शकतात. अशा प्रकारे, आपल्यासाठी काय योग्य आहे हे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

२. जीवनशैलीत आवश्यकतेनुसार बदल करा

३. मद्यपान व धुम्रपान व्यसन सोडा

४.  नियमित व्यायाम करा

५.  पौष्टिक आहाराचे सेवन करा
६. रस्त्यावरील मसालेदार, तेलकट व शितपेयांचे सेवन करणे टाळा

(डॉ. रॉय पाटणकर हे मुंबईतील झेन रूग्णालयातील ग्रॅस्ट्रोलॉजिस्ट आणि संचालक आहेत.)