इन्फ्लुएंसर आणि आता अभिनेत्री कुशा कपिला हिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल उघडपणे सांगितले आहे की, “ती सध्या तिच्या जिम वर्कआउट आणि आहाराची विशेष काळजी घेत असेल, पण एक काळ असा होता जेव्हा तिने सर्व चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे तिचे नुकसान झाले.”
अभिनेत्री कुशा कपिलाने तिला बॉडी डिसमॉर्फिया (Body Dysmorphia) असल्याचे सांगितले. ही अशी स्थिती आहे, जिथे एखादी व्यक्ती फक्त त्यांच्या दिसण्यातच दोष शोधते आणि इतरांच्या मतावर अवलंबून असते. हे मान्य करून कपिला म्हणते की, “तिने १३ ते ३३ वयोगटात वजन कमी करण्यासाठी सर्व पर्यायांचा अवलंब केला होता, त्यापैकी एक म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणे.”
एका महिलेसाठी रोजच्या आहारात सामान्यत: दैनिक कॅलरीजचे प्रमाण १,८०० ते २००० कॅलरीज असते. पण, वजन कमी करण्यासाठी कुशाने दैनंदिन आहारात फक्त ८०० कॅलरीजपुरते मर्यादित ठेवले होते आणि रोज फक्त पोळी आणि टोमॅटो करी सेवन केले, ज्यामुळे तिचे वजन आश्चर्यकारकपणे कमी झाले. पण, या प्रक्रियेत तिचे स्नायू कमी झाले, तिची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आणि तिला आतड्यांसंबंधी क्षयरोग (abdominal tuberculosis) झाला. “कमी प्रमाणात अन्न खाल्ल्याने शरीरावर विनाशकारी परिणाम होऊ शकतात,” असे आहारतज्ज्ञ वेदिका प्रमाणी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. त्या मुंबई येथील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल आहारतज्ज्ञ आहेत.
वजन कमी करण्यासाठी अत्यंत कमी कॅलरीज असलेला आहार प्रभावी ठरू शकतो का? (Can an extremely calorie-deficit diet work for quick weight loss?)
कमीत कमी अन्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते हा एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात सूप, शेक आणि प्रोटीन बार खाऊन कॅलरीजचे सेवनावर अत्याधिक निर्बंध घालणे चयापचयाची गती कमी करते. अशा स्थितीमध्ये शरीर ऊर्जा वाचवते आणि फॅट्स टिकवून ठेवते. शिवाय या कॅलरीजचे सेवनावर अत्यधिक निर्बंध घालण्याच्या पद्धतींमुळे स्नायूंचे नुकसानदेखील होऊ शकते. जेव्हा तुम्ही पुरेसे जेवत नाही, शरीर ऊर्जेसाठी स्नायूंच्या ऊतींचा वापर करण्यास सुरुवात करते, ज्यामुळे स्नायूंचे वस्तुमान आणि शक्ती कमी होऊ शकते
८०० कॅलरीज असलेल्या आहाराचे परिणाम काय आहेत? (What are the consequences of the 800-calorie diet?)
दररोज फक्त ८०० कॅलरीज घेतल्याने थकवा, बद्धकोष्ठता, मळमळ आणि अतिसार असे दुष्परिणाम होऊ शकतात, विशेषतः जर तुम्ही दररोज तेच अन्न घेत असाल. जरी काही लोक आठ आठवड्यात १४ किलोपर्यंत वजन कमी करू शकतात, तरी अशा आहारामुळे जास्त प्रमाणात पौष्टिक कमतरता होते, स्नायूंचे वस्तुमान कमी होते, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, हाडांची घनता कमी होते. असे दिसून आले आहे की, शरीर साठवलेले फॅट्स वापरते आणि फॅट्स रक्तप्रवाहात सोडते, यामुळे पित्ताशयाच्या खड्यांसारख्या समस्या उद्भवू शकतात; कारण यकृत अतिरिक्त फॅट्स कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकत नाही.
तुम्ही काय खाता हे का महत्त्वाचे आहे (Why what you eat becomes important )
अन्नाद्वारे वापरल्या जाणाऱ्या कॅलरीजची संख्या आणि शरीराने ऊर्जेसाठी वापरलेल्या कॅलरीजची संख्या यांच्यातील संतुलन हे बऱ्याच काळापासून सुवर्ण मानक म्हणून प्रचलित असले तरी वजन व्यवस्थापन हे फक्त तुम्ही किती खाता यावर नाही, तर तुम्ही काय खाता यावर अवलंबून असते.
सर्व कॅलरीजचा तुमच्या शरीरावर समान परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, साखरेच्या सोड्यापासून मिळणारी कॅलरी चिकनच्या पातळ तुकड्यांपेक्षा किंवा भाज्यांमधून मिळणाऱ्या कॅलरीजपेक्षा खूप वेगळी आहे. सोड्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी जलद वाढते, ज्यामुळे भूक वाढते आणि फॅटस् साठवण्यास मदत होते. याउलट प्रथिने, फायबरयुक्त भाज्या आणि हेल्दी फॅट्स यांसारखे संपूर्ण अन्न अधिक पोट भरणारे असतात आणि भूक व ऊर्जेची पातळी अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत करतात. हे पदार्थ वजन कमी करण्यासाठी अधिक संतुलित आणि शाश्वत पद्धतीला समर्थन देतात.
तुमच्या शरीरातील मॅक्रोन्यूट्रिएंट्स किंवा प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स रचनादेखील तितकीच महत्त्वाची आहे. जास्त प्रथिने असलेले आहार तृप्ती वाढवतात आणि स्नायूंचे वस्तुमान राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पचनक्रियेदरम्यान अधिक कॅलरीज बर्न होतात. दुसरीकडे, रिफाइंड शुगर आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्स जास्त असलेल्या आहारामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शरीराची फॅट्स कार्यक्षमतेने वापरण्याची क्षमता कमी होते आणि जास्त खाल्ल्याशिवायही वजन वाढू शकते.
नियमित जेवणामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते, ज्यामुळे ऊर्जा कमी पडणे आणि तीव्र भूक लागणे टाळता येते, ज्यामुळे अनेकदा अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. जेवणाची वेळ योग्य पद्धतीने चयापचय होण्यास मदत करते आणि शरीराला दिवसभर पोषक तत्त्वे मिळतात याची खात्री करते..