संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ल्युकोडर्मा या त्वचेचा रोग असलेल्या रुग्णांना आशादायी संशोधन करून वनस्पतींवर आधारित असे औषध शोधून काढले आहे. त्यामुळे रुग्णांना नव संजीवनी मिळणार आहे. व्हिटिलिगो दिन अलीकडेच पाळण्यात आला. त्यानिमित्त या औषधाची घोषणा करण्यात आली. त्वचेवर पांढरे डाग हा सामाजिक कलंक मानला जातो, त्यामुळे अशा रुग्णांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते, त्यांना हे औषध वरदान ठरणार आहे. ल्युकोस्किन असे या औषधाचे नाव असून ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे हेमंत पांडे यांनी विकसित केले आहे. त्यांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विज्ञान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पांढरे डाग म्हणजे व्हिटिलिगोमुळे अनेक रुग्ण त्रस्त असतात, त्यांचा आत्मविश्वास गमावलेला असतो. पांडे हे पिठोरगड येथील डीआरडीओच्या डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ बायो एनर्जी रिसर्च या संस्थेत काम करतात. त्यांनी तयार केलेले ल्युकोस्किन हे औषध दिल्ली येथील एआयएमआयएल फार्मा लि. या कंपनीने बाजारात आणले आहे. व्हिटिलिगोवर अ‍ॅलोपथी व इतर पद्धतीत उपचार असले तरी ते प्रभावी नाहीत, शिवाय हे उपचार महागडे आहेत. ते एका औषध रेणूवर आधारित आहेत. त्यातून इतर वाईट परिणाम होतात. त्यामुळे त्वचेची आग होते. ल्युकोस्किन औषधामुळे रुग्णांना चांगला फायदा होतो. ल्युकोस्किन औषधासाठी पांडे यांना २०१५ मध्येही पुरस्कार मिळालेला आहे. हिमालयीन जडीबुटीपासून पांडे यांनी औषध तयार करण्याची पद्धत विकसित केली असून हे औषध मलम व तोंडावाटे पातळ औषध या स्वरूपात मिळते. त्यामुळे उन्हाचा त्वचेवर परिणाम रोखला जातो. पातळ औषधाने शरीरावर नवीन डाग येत नाहीत. भारतात ल्युकोडर्माचे प्रमाण १ते २ टक्के आहे. राजस्थानातील काही भागात त्याचे प्रमाण ४ ते ५ टक्के आ हे. गुजरातेत ते सर्वाधिक ५ ते ८ टक्के आहे. पांढरे डाग त्वचेवर आल्यास लोक सदर रुग्णास कुष्ठरोग झाला असे  समजून वाळीत टाकतात, पण हा रोग वेगळा आहे, असे पांडे यांनी सांगितले.